🌟राहुल सांकृत्यायन : बौद्ध त्रिपिटकाचार्य : फक्त हजार शब्दांचा ज्ञानवर्धक लेख....!


🌟राहुल सांकृत्यायन जयंती व पुण्यस्मृती विशेष🌟


लेखक : अलककार - कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.                     मु.पो.ता.जि.गडचिरोली

असामान्य पांडित्यामुळे राहुलजींना महापंडित, महामानव, तसेच बौद्ध ग्रंथाच्या सखोल अध्ययनामुळे त्रिपिटकाचार्य अशी गौरवपूर्ण अभिधाने बहाल केली गेली. बौद्ध देशांतून तसेच रशिया आदी देशांतून त्यांना खुप मानसन्मान लाभले. भारतातही त्यांना सन्मान्य डॉक्टरेट आणि साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला. भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांना गौरविले. अधिक जाणून घ्या श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजींच्या या लेखाद्वारे... संपादक.

      राहुल सांकृत्यायन इराणमार्गे सन १९३७मध्ये रशियात गेले. ही त्यांची रशियाची दुसरी यात्रा होती. यावेळी लेनिनग्राड येथील ओरिएंटल इन्स्टिट्यूटमध्ये ते प्राध्यापक म्हणून गेले. या संस्थेच्या सचिव एलेना होत्या. एलेना- लोला याच पुढे त्यांच्या पत्नी झाल्या. त्यांना पुन्हा एकदा तिबेटात जायचे होते. म्हणून ते लवकरच भारतात परतले व त्यांनी तिबेटचा प्रवास केला. नंतर त्यांनी भारताच्या गरीब जनतेची सेवा करणे व किसान मजदूर राज्य भारतात आणणे यासाठी राजकाणात सक्रीय भाग घेतला. परिणामी ते एकूण अडीच वर्षे तुरुंगात होते. तुरुंगात त्यांनी लेखन करून हिंदी साहित्यात मोलाची भर घातली. वोल्गा से गंगा हा तुरुंगात लिहिलेल्या त्यांच्या नितांतसुंदर हिंदी कथांचा संग्रह आहे. भारतीय व परदेशी अशा १५ भाषांत या कथा अनुवादित झाल्या आहेत. पुन्हा त्यांना रशियाचे निमंत्रण आले. त्यानुसार सुमारे दोन वर्षे रशियात राहून ते भारतात परतले. सन १९४९मध्ये हैदराबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल करून त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी त्यांच्या खाजगी सचिव नेपाळी महिला कमला त्यांच्या सोबत होत्या. पुढे त्याही त्यांच्या पत्नीच झाल्या. एलेनापासून त्यांना इगोर राहुलोविच तर कमलापासून जया व जेता ही संतती झाली.

     लहानपणापासूनच त्यांनी सातत्याने विपुल लेखन केले. हिंदी- मेरी लद्दाख यात्रा, तिब्बतमे सवा वर्ष, मेरी यूरोप यात्रा, जापान आदी प्रवासवर्णने त्यांनी लिहिली. हिंदी कथा, कादंबरी क्षेत्रातही त्यांनी मोलाची भर घातली. कथा- सतमी के बच्चे, बहुरंगी मधुपुरी, कनैलाकी कथा इत्यादी. कादंबऱ्या- जीने के लिए, जय योधेय, विस्मृत यात्री इ. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनाचे दर्शन घडते. केवळ प्राचीन परंपरेला न अनुसरता इतिहास संशोधनाच्या वृत्तीने त्यांनी आपल्या पात्रांचे जीवनचरित्र, सामाजिक परिस्थिती इत्यादींचे चित्रण केले. संस्कृत-प्राकृतादी प्राचीन भाषांतील ग्रंथ त्यांनी हिंदीत भाषांतरित करून हिंदी भाषेला अधिक संपन्न केले. त्यांच्या ग्रंथाची एकूण संख्या १५० वर भरते. धर्म, तत्त्वज्ञान, राजनीती, इतिहास, पुरातत्त्व, समाजशास्त्र, प्राच्यविद्या, व्याकरण, संस्कृती, भाषा-साहित्य, कोश, विज्ञान, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, कथा-कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, देशदर्शन इत्यादी विषयांवर व प्रकारांत त्यांनी दर्जेदार लेखन केले. हिंदीशिवाय त्यांनी संस्कृत, अपभ्रंश व तिबेटितही ग्रंथ लिहिले व अनेक प्राचीन संस्कृत ग्रंथ उत्तम प्रकारे संपादून प्रकाशात आणले. त्यांच्या लेखनाचा आणि विद्वत्तेचा आवाका फार विशाल असल्याचे त्यांच्या प्रकाशित ग्रंथांच्या यादीवर सहज नजर टाकली, तरी लक्षात येईल.

    राहुल सांकृत्यायन हे जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित व लेखक होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशात कनैला, जि. आझमगढ या गावी दि.९ एप्रिल १८९३ रोजी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव केदारनाथ व कुलनाम पांडे होते. माता पिता कुलवंती व गोवर्धन होत. बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्यानंतर केदारनाथांनी राहुल हे नाव धारण केले व सांकृत्य हे त्यांचे गोत्र असल्याने ते राहुल सांकृत्यायन या नावाने प्रख्यात झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी उर्दू मिडल स्कूल परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते घरातून पळून गेले. वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला होता, पण हा अजाणतेपणी झालेला विवाह म्हणून त्यांनी त्याचे बंधन मानले नाही. अठराव्या वर्षी ते वाराणसीला गेले व तेथे त्यांनी संस्कृत आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले. त्यांना केवळ विद्वत्ता नको होती, तर साधू व्हायचे होते. त्यांची विरक्त वृत्ती पाहून छप्रा गावच्या एका महंताने त्यांना वैष्णव धर्माची दीक्षा दिली. त्यांचे पंथीय नाव रामोदार साधू असे ठेवले. काही काळ तेथील मठपती म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नंतर ते छाप्रा गाव सोडून दक्षिण भारताच्या तीर्थयात्रेस गेले.

     त्यांनी सबंध भारताचा प्रवास केला. त्यांच्या वृत्तीत स्वतःस झोकून देण्याची उत्कटता होती. एकदा मनाने घेतलेल्या गोष्टींकडे ते उत्कटपणे धाव घेत व तिचा संपूर्ण व सखोल वेध घेत. दक्षिण भारताची तीर्थयात्रा सोडून ते अयोध्येस आले व त्यांनी संस्कृत पाठशाळेत वेदांताचा सखोल अभ्यास केला. अयोध्येतच ते आर्यसमाजाकडे आकृष्ट झाले व त्यांनी दयानंदांच्या सत्यार्थ प्रकाशाचे सखोल अध्ययन केले. आर्यसमाजाच्या विचारांचा त्यांच्यावर खुपच प्रभाव पडला. अयोध्येहून ते आग्र्यास गेले व तेथील आर्यसमाजाच्या विद्यालयात दाखल झाले. ख्रिस्ती व इस्लाम धर्मीय आपल्या धर्मप्रसारासाठी आटोकाट प्रयत्नच करतात व हिंदूंवर आघात करतात, म्हणून त्यांनी विरक्त, विद्वान व संघटनाकुशल अशा हिंदू तरूणांची मिशनरी त्यागीवृत्तीने काम करणारी संघटना उभारण्याचा प्रयत्न केला. रशियात सन १९१७मध्ये झालेल्या क्रांतीने ते प्रभावित झाले आणि क्रांतीकडे व साम्यवादाकडे आकृष्ट झाले. त्यांनी साम्यवादी तत्त्वज्ञान सखोलपणे अभ्यासले. बाइसवी सदी हा त्यांचा ग्रंथ याचेच फलित होय. मार्क्सवादावर त्यांनी बरेच लेखन करून त्याचा प्रचारही केला. साम्यवाद ही क्यो?सोविएत न्याय, मानव समाज, आजकी समस्याएँ, आजकी राजनीति आदी त्यांचे राजनीतीवरील उल्लेखनीय ग्रंथ होत. नंतर ते बौद्ध धर्माकडे आकृष्ट झाले. त्यांनी पाली भाषा-साहित्याचे व बौद्ध धर्म-तत्त्वज्ञानाचे सखोल अध्ययन केले. लखनौ येथील बोधानंद भिक्षू यांच्याशी परिचय झाल्यावर त्यांनी त्यांच्यासमवेत अनेक बौद्ध तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. त्यांना यात्रेत परदेशी भिक्षूही भेटले. भारताबाहेरही बौद्ध धर्माचा प्रसार बराच आहे, असे समजल्यावर त्यांनी त्या त्या देशांच्या भाषा व लिपी यांचा अभ्यास केला. उर्दू, हिंदी, संस्कृत−प्राकृत, पाली−अपभ्रंश, इंग्रजी, अरबी, फार्सी, फ्रेंच, तमिळ, कन्नड, चिनी, तिबेटी, जपानी, रशियन, आदी भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते.

     बौद्ध धम्माकडे ते अधिकाधिक आकृष्ट झाले आणि त्यांनी सन १९३० साली श्रीलंकेत जाऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. साम्यवाद व बौद्ध धम्मतत्त्वज्ञान या दोहोंच्या समन्वयाने त्यांचे विचार समतोल व अधिक तेजस्वी बनले. सनातन धर्माकडून आर्यसमाजाकडे तेथून साम्यवादाकडे तेथून बौद्ध धम्माकडे व शेवटी मानव धर्माकडे असा त्यांच्या वैचारिक प्रवास झाला. मध्यंतरी सन १९२१मध्ये त्यांनी गांधीजींच्या हाकेस प्रतिसाद देऊन स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली. तिथून सहा महिने आणि  सन १९२५ पर्यंत दोन वर्षे त्यांनी तुरुंगवासही भोगला. तुरुंगात त्यांचा व्यासंग व लेखन सुरूच होते. नंतर दोन वर्षांनी ते बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी संस्कृतचे अध्यापक म्हणून श्रीलंकेत गेले. नंतर ते अधिक सखोल अध्ययनासाठी नेपाळमार्गे तिबेटात ल्हासा येथे गेले. तिबेटमधून ते सन १९३०साली पुन्हा श्रीलंकेत गेले. नंतर बौद्ध धर्मप्रचारासाठी ते दोन वर्षांत लंडन येथे व तेथून यूरोपात गेले. यूरोपात ते सुमारे तीन महिने होते. सन १९३३मध्ये ते पुन्हा युरोपातून श्रीलंकेत गेले व तेथून भारतात परतले. तेथून पुन्हा दुसऱ्यांदा जमू-काश्मीरमार्गे लडाख येथे गेले. या प्रवासात त्यांनी सुत्तपिटकातील प्रख्यात ग्रंथ मज्झिमनिकायचा हिंदीत अनुवाद केला. नंतर त्यांनी पुढे धम्मपद, विनयपिटक, दीघनिकाय यांचे हिंदीत अनुवाद केले. तसेच आनंदकौशल्यायन व जगदीश काश्यप यांच्या सहकार्याने खुद्दकनिकायचे अकरा ग्रंथ देवनागरीत आणले. तसेच त्यांनी बुद्धचर्या आणि महामानव बुद्ध हे बुध्दाचे चरित्र असलेले ग्रंथ हिंदीत लिहिले.

      बिहारात १९३४मध्ये मोठा भूकंप झाला. तेव्हा भूकंप ग्रस्तांच्या सेवेसाठी ते बिहारमध्ये राहिले. नंतर ते पुन्हा सिक्कीममार्गे तिबेटात ल्हासा येथे गेले. तिबेटमध्ये जाण्याचा त्यांचा हेतू भारतात उपलब्ध नसलेल्या संस्कृत ग्रंथाचा शोध घेणे, हा होता. हे ग्रंथ मूळ वा अनुवाद रूपात तिबेटमध्ये उपलब्ध असावेत, अशी त्यांची धारणा होती. नंतर ते पूर्वेकडील बौद्ध धर्मीय देशांत- ब्रह्मदेश, थायलंड, जपान, कोरिया येथे गेले. सन १९३५ मध्ये ते जपानला पोहोचले. या यात्रेवरून परतल्यावर ते परत नेपाळमार्गे तिबेटात गेले. या तिबेट यात्रेत त्यांना अनेक अत्यंत महत्त्वाचे प्राचीन ग्रंथ मिळाले व ते त्यांनी भारतात आणले. त्यांनी तिबेटी ग्रंथ कंजूर- मूळ बुद्धवचनांचे अनुवादग्रंथ, संख्या १,१०८; तंजूर- अनुवादित भाष्यग्रंथ; संख्या ३,४५८आहे. तसेच अनेक संस्कृत हस्तलिखितांच्या छायाप्रती वा नकला करून आणल्या. हा महत्त्वपूर्ण प्राचीन ग्रंथसंभार पाटणा येथील बिहार रिसर्च सोसायटी व के.पी. जयस्वाल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालयांत जतन करून ठेवला आहे. त्यांनी तिबेटातील मठांतून भारतातून नष्ट झालेल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या आणलेल्या छायाप्रतींत वसुबंधुकृत अभिधर्मकोश-भाष्य, अभिधर्मदीप महासांधिकांचे प्रतिमोक्षसूत्र, अर्थविनिश्चयसूत्र टीकेसहीत दुर्वेकृत धर्मोत्तर प्रदीप, प्रमाणवार्तिक भाष्य, योगाचारभूमी, विनयसूत्र व त्यावरील वृत्ती आणि टीका वगैरेंचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

     मसूरी येथील वास्तव्यात त्यांनी मध्य एशियाका इतिहास- २ भाग, तसेच ‘हिमालय परिचय’ योजनेच्या अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. सन १९५४मध्ये त्यांनी कार्ल मार्क्स, लेनिन, स्तालिन आणि माओत्सेतुंग यांची चरित्रे लिहिली. मेरी जीवनयात्रा हे त्यांचे आत्मचरित्र होय. ते विमानाने चीनला गेले. तेथे ते साडेचार महिने होते. भारतात परतल्यावर श्रीलंकेच्या निमंत्रणावरून विद्यालंकार विद्यापीठात ते तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून १९५९ मध्ये गेले. शेवटी प्रकृत्ती बरी नसल्याने ते भारतात परतले. त्यांना स्मृतीभ्रंश जडला व नंतर त्यातच दार्जिलिंग येथे त्यांचे दि.१४ एप्रिल १९६३ रोजी निधन झाले.

!! जंग ऐ अजित न्युज परिवारातर्फे त्यांच्या अचाट साहित्यकृतीला विनम्र अभिवादन !!

अलककार-  श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.                     मु.पो.ता.जि.गडचिरोली

 फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या