🌟आपत्तीच्या काळात "गोल्डन आवर" ओळखणे गरजेचे - जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस


🌟वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात🌟


फुलचंद भगत

वाशिम :- आपत्तींमुळे होणारी हानी टाळण्यासाठी किंवा त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे.आपत्तींमुळे होणारी हानी टाळायची असेल, तर आपत्ती उद्भवायच्या अगोदरपासूनच आपत्तीचा अंदाज घेणे, प्रतिबंधात्मक उपाय योजणे, आपत्तीचे उपशमन आणि आपत्तीदरम्यान योग्य बचावासाठी कार्यवाही हाती घेणे इत्यादी गोष्टीचे नियोजन व व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या ठरतात. आपत्तीच्या काळात गोल्डन आवर खूप महत्त्वाचा असतो. अपघात घटनेच्या ठिकाणी छायाचित्रे व व्हिडिओ काढत न बसता मदत करावी. जेणेकरून अपघातग्रस्तांचे प्राण वाचावेत . यावेळी गोल्डन अवर ओळखता आला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या पुढाकारातून जिल्ह्यात  आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याच अनुषंगाने दि.२७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. 


  याप्रसंगी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब दराडे, राष्ट्रीय प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक बि.के.जयस्वाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना त्या म्हणाल्या,नैसर्गिक आपत्तींमुळे  कितीतरी लोकांची घरेदारे नष्ट होतात. वेळेप्रसंगी प्राणास मुकले जातात.  आपत्तींमुळे तर कुटुंबाचा आर्थिक कणाच मोडून जातो. त्यासाठी या आपत्तीसंबंधी लोकांना शिक्षित करावे, माहितीची देवाणघेवाण व्हावी, या परिस्थितींना तोंड देण्याचे प्रशिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन होत आहे.

  यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्य करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचे श्याम सवाई, गजानन मेसरे, एनसीसीचे शिक्षक अमोल काळे व त्यांचा चमू तसेच एनडीआरएफचे अधिकारी व त्यांच्या चमूला गौरविले.आपत्तीत न घाबरता त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पूणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाच्या अधिकारी व त्यांच्या चमूने प्रात्यक्षिकातून उपस्थितांना मार्गदर्शन केले या मार्गदर्शनपर शिबीरात सीपीआर कसा द्यायचा, पूर परिस्थितीत नागरिकांना कसे सुरक्षित स्थळी पोहचायचे. प्राण कसे वाचवायचे,सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार कसे करावे. विषारी, निम विषारी, बिन विषारी साप कसा ओळखावा. लोकांचे प्राण कसे वाचवावे. सापाचे प्रकार किती आहे,

रस्ते अपघात झाल्यास लोकांचे प्राण कसे वाचवावे. प्रथमोचार कसे करावे.,अग्निशमन यंत्र कसे हाताळावे. आग लागल्यास ती कशी विझवावी. घरगुती गॅस कसा हाताळावा., विजेपासून नागरिकांनी स्वतःचे प्राण कसे वाचवावे.याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.संचालन व उपस्थितांचे आभार शाहू भगत यांनी मानले.यशस्वितेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.प्रशिक्षणाला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या