🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी बकरी ईद निमित्त सूचनांचे पालन करावे - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीचे सदस्य व संबंधीत खाते प्रमुख यांच्या बैठकीत बोलतांना ते म्हणाले🌟

परभणी (दि.14 जुन 2024) : जिल्ह्यात बकरी ईद शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करण्यात यावी, यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी  केले आहे.  त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीचे सदस्य व संबंधीत खाते प्रमुख यांची बैठक नुकतीच पार पडली. 

महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 मधील कलम 5 अन्वये गाय, वळू किंवा बैलांची कत्तल बकरी ईद निमित्त करण्यात येवू नये. केंद्र शासनाच्या prevention of cruellty to animals rules 2001 मधील नियम 3 अन्वये गर्भधारणा केलेले पशू, 3 महिन्यापेक्षा कमी वयाचे पशू, सक्षम अधिकाऱ्याने कत्तल योग्य असे प्रमाणिकरण न केलेले पशू यांची कत्तल करण्यात येवू नये.  जिल्हा प्रशासनाकडून बकरी ईद निमित्त जे कत्तलखाने तयार करण्यात आले आहेत, त्याच ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यात यावी. मोकळ्या जागेत किंवा घरी कत्तल करण्यात येवू नये. प्राण्यांच्या मांसाची वाहतूक करताना मांस पूर्णपणे झाकलेले असावे. कत्तलखान्याच्या ठिकाणी मनपाने पाण्याची सोय करावी. तसेच ईदगाह मैदानावर आवश्यक तेवढ्या सोयी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही यावेळी श्री. गावडे यांनी दिल्या. 

उपआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. परभणी यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी- कर्मचा-यांच्या बकरी ईद निमित्त कत्तलखाने व इतर आवश्यक त्या ठिकाणी नियुक्त्या कराव्यात. नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी नियुक्ती ठिकाणी हजर राहून दि. 15 ते 17 या कालावधीत आपले कर्तव्य पार पाडावे. याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही, याची दक्षता घ्यावी असेही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी सांगितले......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या