🌟शहाजी राजे भोसले जयंती विशेष...आणि "शहाजी" नाव भारतवर्षात दुमदुमले....!

 


🌟मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई (उमाबाई) यांच्या पोटी वेरूळ इथे शहाजी राजे यांचा जन्म दि.१८ मार्च १५९४ रोजी झाला🌟

शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते. शहाजीराजांनी आदिलशाही तसेच निजामाकडे सुभेदार म्हणून मोठे पराक्रम केले. त्यांनी पुण्यासारख्या भागात मराठी जनतेला आपला पराक्रम तर दाखवला होताच पण त्याचबरोबर कर्नाटकातदेखील त्यांनी आपले कर्तृत्व गाजवले होते. उद्बोधक व ज्ञानवर्धक माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या या संकलित लेखात पाहुया... संपादक

मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई (उमाबाई) हिच्या पोटी वेरूळ इथे शहाजी राजे यांचा जन्म दि.१८मार्च १५९४ रोजी झाला. शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. काहींच्या मते मालोजी भोसले यांची मुख्य राणी उमा ही असून तिच्या पोटी शहाजी यांचा जन्म झाला, असे सांगितले जाते. बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला अहमदनगर जवळील मुकुंदनगर भागात तारकपूर बस स्टँडपाशी नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स.१६०५मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. अहमदनगर जवळच्या भातवडी येथे झालेल्या युद्धात शहाजीराजे यांनी प्रथम गनिमी काव्याचा वापर केला. जिथे मोघल सैन्य वस्तीला होते त्यावरील भागात असलेल्या धरणाची भिंत फोडून दहा हजार सैन्यानिशी दोन लाख सैन्याच्या पाडाव केला. दि.१६ सप्टेंबर १६३३ रोजी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भिमगडावर- शहागडावर लहानग्या मुर्तजा या निजमास मांडीवर घेऊन स्वतः सिंहासनाधिश्वर झाले व हे राज्य सलग तीन वर्षे चालवले म्हणजेच स्वराज्याचा संकल्प शाहागडवर घेतला. म्हणूनच शहागड हा किल्ला पुढे शहाजी महाराजांची स्वराज्य संकल्प भूमी म्हणून उदयास आली.

         मालोजीराजे भोसले आपला भाऊ विठोजीराजे भोसले इ.स.१५७७मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर शहाजींचे पिता मालोजीराजे यांनी लखुजीराजे जाधव यांची नोकरी सोडून इ.स.१५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली. मुघल शहेनशाह शहाजाहा याने इ.स.१६२४ लष्कर खानला १.२ लाखाचे सैन्यासह रवाना केले. सोबत आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन निघाला. शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवून १० हजार त्यांनी स्वतःकडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. तेव्हा अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले आणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. भातवडी हे गावं अहमदनगर पासून १५ किमी अंतरावर आहें.

           शहाजीराजांनी आपले पुत्र छ.शिवाजी महाराजांना पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. शिवाजीराजांबरोबर दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख हेही पुण्यात आले. राज्यकारभारासाठी आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली. छ.शिवाजींच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांस फूस आहे या संशयाने आदिलशाहीने मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै १६४८चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात, असे त्यांनी लिहिले. याबदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी, ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते, हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि.१६ मे १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.

           अफझलखान स्वराज्यावर चालून आला, तेव्हा अफझलखानाची दगाबाजी माहिती असल्याने शहाजीराजेंनी १७,००० फौज विजापूर बाहेर खडी ठेवली होती. शहाजीराजांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही- या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे असे- इ.स.१६२५ ते इ.स.१६२८- आदिलशाही, इ.स.१६२८ ते इ.स.१६२९- निजामशाही, इ.स.१६३० ते इ.स.१६३३- मुघलशाही, इ.स.१६३३ ते इ.स.१६३६ - निजामशाही, इ.स.१६३६ ते इ.स.१६६४ - आदिलशाही, पुढे इ.स.१६६१- इ.स.१६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच दि.२३ जानेवारी, इ.स.१६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा पाय एका वृक्षवेलीमध्ये अडकला, ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी जिल्हा दावणगिरी- कर्नाटक येथे बांधली.

!! जयंतीच्या पावन पर्वावर शहाजीराजांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !!

      - संकलन व शब्दांकन :-

श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                      रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                     फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.


                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या