🌟परभणी जिल्ह्यात आयुष्यमान कार्ड वितरीत करण्याची जलद कार्यवाही करावी : डॉ.ओमप्रकाश शेटे


🌟आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार🌟


परभणी (दि.11 जानेवारी) : राज्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्यास आरोग्य उपचार सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि सर्व संबंधित यंत्रणांने आयुष्यमान भारत योजनेतंर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करुन प्रत्यक्ष लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्याची कार्यवाही जलद पद्धतीने राबवावी, अशा सूचना आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयुष्यमान भारत योजनेची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी डॉ. शेटे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. शेटे म्हणाले की, देशातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकास आरोग्याच्या अत्याधुनिक सेवा मोफत मिळाव्यात यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्यातील जास्तीत-जास्त लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना आयुष्यमान कार्ड देण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 80 ते 90 टक्के नागरिकांना या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. रस्ते अपघातातील उपचारासाठी प्रति अपघात रु. 1 लाख एवढी मर्यादा वाढविण्यात आली असून याचा योजनेत समाविष्ट करण्यात आल आहे.  तसेच महापालिका क्षेत्रात आयुष्यमान कार्डची नोंदणी कमी असून, महापालिकेने कार्डची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करीत या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा. तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी देखील या मोहिमेसाठी देवस्थान व्यवस्थापनाची मदत घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सीएससी केंद्रांनी राष्ट्रकार्य म्हणून अधिकाधिक आयुष्यमान कार्डची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी डॉ. शेटे यांनी दिल्या.

राज्यभरात जवळपास एक हजार खासगी रुग्णालय पॅनेलवर असुन येणाऱ्या कालावधीत आणखी 350 रुग्णालयांना पॅनेलवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या जवळच्या रुग्णालयातच आरोग्य उपचारांच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. परभणी जिल्ह्यात या योजने अंतर्गत 13 रुग्णालये पॅनेलवर आहेत. आरोग्य यंत्रणांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालूक्यातील किमान दोन रुग्णालय पॅनेलवर येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश डॉ. शेटे यांनी दिले.

यावेळी डॉ. शेटे यांनी आयुष्यमान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधा बाबत आढावा घेतला. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे आणि जिल्हा समन्वयक डॉ. संदीप गाडेकर यांनी सादरीकरणाद्वारे आयुष्यमान भारत योजनेतंर्गत जिल्ह्यात 12 लाख 22 हजार 571 लाभार्थ्यांपैकी 3 लाख 92 हजार 035 लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आले असुन, उर्वरित कार्डधारकांची नोंदणी करून कार्ड वितरणाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सादर केली. 

यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या