🌟जलयुक्त शिवार योजनेतून परभणी जिल्ह्यासह हिंगोली,नांदेड,धाराशिव जिल्ह्यांनाही वगळले.....!


🌟संभाजी सेना संतप्त : जलयुक्त शिवार योजनेत परभणीसह हिंगोली,नांदेड धाराशिव जिल्ह्यांचाही समावेश करण्याची मागणी🌟 

परभणी (दि.०४ डिसेंबर) - जलयुक्त शिवार च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग समवेत जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेतीचा सामंजस्य करार केलेला आहे. जलयुक्त शिवार दोन मध्ये 'गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार' च्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्तविकास केंद्र आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली.

 या कराराद्वारे राज्यातील नागपूर,वर्धा,चंद्रपूर,अमरावती,अकोला, बुलढाणा,यवतमाळ,वाशिम,सांगली,सातारा,कोल्हापूर,सोलापूर, पुणे,अहमदनगर,लातूर,बीड,जालना,छत्रपती संभाजी नगर, नंदुरबार,धुळे,नाशिक,जळगाव,ठाणे,पालघर अशा २४ जिल्ह्यातील ८६ तालुक्यांचा जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची तसेच जलस्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे खोलीकरण, सिमेंट बंधारे बांधणे, शेत तळे कामे होणार आहेत. या कामासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्याचबरोबर कृषी विभागाशी झालेल्या करारानुसार राज्यात व्यक्ती विकास केंद्र हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पिकविणे, मनुष्यबळ विकास, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, सध्याची रसायने व खतावर आधारित पारंपारिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये बदलणे ही कामे कृषी विभागाशी समन्वयाने करणार आहे. या योजनेसाठी राज्यातील २४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पुणे, कोल्हापूर, सांगली, व नाशिक या बहु सुपीक जिल्ह्यांचा समावेश या योजनेसाठी झालेला असून मराठवाड्यातील परभणीसह हिगोली,नांदेड या जिल्ह्यांचा समावेश न झाल्याने येथील शेतकरी व जनतेवर फार मोठा अन्याय झालेला आहे.

या अन्यायाविरुद्ध संभाजी सेना संतप्त झाली असून आज संभाजी सेनेच्या वतीने परभणी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्री श्री रविशंकरजी गुरुजी यांना निवेदन पाठवण्यात आले असून महाराष्ट्रातील २४ जिल्ह्याबरोबरच परभणी,हिंगोली,नांदेड धाराशिव या जिल्ह्यांचा देखील सदर योजनेमध्ये समावेश करून येथील पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सोडवून  दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकरी व जनतेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली असून या निवेदनावर संभाजी सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, परभणी जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, शहराध्यक्ष अरुण पवार,डाकू पिंपरीचे सरपंच व्यंकट गीते,टाकलगव्हानचे सरपंच वैजनाथ महिपाल,अकाशदीप लंगोट,प्रकाश राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या