🌟अन्नधान्य,कडधान्य व गळतीधान्य पिकस्पर्धा रब्बी हंगाम-2023 : 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे अवाहन....!


🌟या पीक स्पर्धेकरीता ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस ही एकूण 5 रब्बी पीके आहेत🌟

परभणी (दि.12 डिसेंबर) :  राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढून आणखी उमेदीने नव-नवीन अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवत राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

         वंचित/दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेवून तसेच जास्तीत-जास्त शेतकरी पिक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम-2023 पासून पिक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

            या पीक स्पर्धेकरीता ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस ही एकूण 5 रब्बी पीके आहेत. स्पर्धेसाठी पुढील पात्रता निकषाची आवश्यकता आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

           पीक स्पर्धेसाठी अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असुन यात विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) पिक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत असणे आवश्यक आहे.

रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

         स्पर्धेसाठी पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रू. 300 तर आदिवासी गटासाठी रु. 150 प्रवेश शुल्क राहणार आहे.          स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पुढील प्रमाणे बक्षिस स्वरुप असणार आहे. यामध्ये तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे बक्षीस 3 हजार, तिसरे बक्षीस 2 हजार तर जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसरे 5 हजार आणि राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50 हजार, दुसरे बक्षीस 40 हजार आणि तिसरे बक्षीस 30 हजार मिळणार आहे.

          दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. हरणे यांनी केले आहे. पिक स्पर्धेबाबत अधिक माहीतीकरीता शेतकरी बंधु-भगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी.हरणे यांनी केले आहे..... 


 


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या