🌟मंत्री शंभूराजे देसाई यांच्या यापुढील सर्व पत्रकार परिषदांवर पत्रकारांचा बहिष्कार....!

 


🌟मराठी पत्रकार परिषदेसह सर्व संघटनांनाचाही पाठिंबा🌟

सातारा : राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सातारयातील पत्रकार संघटनांनी एकत्रित घेतला आहे शंभूराजे देसाई यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणारया पत्रकारांशीच हुज्जत घातली..  प्रश्नाची माहिती न घेता पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे असा प्रतिप्रश्न करण्याचा तसेच आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही असे उत्तर देण्याचा प्रकार त्यांच्याकडून सातत्याने होत होता त्यामुळे जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास ते बांधिल नसतील तर पत्रकार परिषदेला जाण्यासही पत्रकार बांधील नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेवर यापुढे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठी पत्रकार परिषदेसह सर्व संघटनांनाचाही पाठिंबा आहे.  

मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर,जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे,सातारा पत्रकार संघ अध्यक्ष विनोद कुलकर्णी,सरचिटणीस दीपक प्रभावळकर ,प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे,परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर  ,राज्य महिला सरचिटणीस विद्या म्हासूर्णेकर,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक राहुल तपासे समन्वयक शंकर मोहिते,डिजिटल मीडिया राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर,तुषार भद्रे,मराठी पत्रकार परिषद सलग्न सातारा जिल्हा पत्रकार संघ,सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सनी शिंदे ,११ तालुक्यांचे पत्रकार संघ यांनी हा निर्णय जाहीर केला.

मंत्री शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पत्रकार परिषदांचा सपाटाच लावला आहे. या पत्रकार परिषदांमध्ये आपल्याला जे आवश्यक आहे तेवढीच माहिती देणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधून हे योग्य नसल्याचेही त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. कोणत्याही पत्रकार परिषदेला वेळेवर न पोहचणे, पत्रकारांना वाट पहात थांबविणे, पत्रकार परिषदेच्या वेळांमध्ये सतत बदल करणे असे त्यांचे प्रकार सुरुच आहेत..  पत्रकारांच्या माहितीबाबत सतत बोलल्यामुळे सर्व पत्रकारांचा कायम अपमान होत आहे. यामुळे आता त्यांच्या कोणत्याही पत्रकार परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी हा निर्णय घेतला असून त्याला मराठी पत्रकार परिषदेसह सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांनीही पाठिंबा दिला आहे.

परिषदेचे  एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष शरद पाबळे यांनी सातारयातील पत्रकारांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या