💥 श्री संत गजानन महाराज यांचे चरित्र व माहिती.....!


💥श्री गजानन महाराज यांच्या विषयी काही विशेष💥 

 ✍️ मोहन चौकेकर

श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. परंतु गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे,

"कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।

साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥

जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्यांनी  त्यांचे महत्त्व ओळखले. त्यांना गजानन  महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, - "दंड गर्दन पिळदार। भव्य छाती दृष्टी स्थिर। भृकुटी ठायी झाली असे॥" जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी गजानन महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या अवस्थेत होते . (तुर्या अवस्था : जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणगे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात)  गजानन महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलाल यांना तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घर। झाले असे पंढरपूर। लांबलांबूनीया दर्शनास येती। लोक ते पावती समाधान॥,"

बंकटलालचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात. शेगांवात राहून महाराजांनी अनेक लीला करून लोकांचे कल्याण केले व त्यांना भक्तीमार्गाला लावले.

जेव्हा श्री गजानन महाराजांनी आपल्या अवतारसमाप्तीची वेळ ठरवली, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु श्री विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला

समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले,

"आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||"

लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री गजानन महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.

त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत गजानन महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील.गजानन महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या गजानन महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे गजानन महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.

त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला,

"जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||,"

आणि शिळा लावून गजानन महाराजांची समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना

"अनंतकोटी ब्रह्मांडनायाक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय!!!"

असे प्रेमादराने संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंका नाही.

गजानन महाराजांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विद्रोही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते.

०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी गजानन महाराजांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले.देह त्याग करण्यापूर्वी गजानन महाराज म्हणाले, "मी गेलो ऐसे मानू नका। भक्तित अंतर करू नका। कदा मजलागी विसरु नका। मी आहे येथेच॥" "दु:ख न करावे यत्किंचित। आम्ही आहोत येथेच। तुम्हा सांभाळण्यापरी सत्य। तुमचा विसर पडणे नसे॥." त्यामुळेच जरी गजानन महाराजांनी समाधी घेतली तरी आजही त्यांच्या भक्तांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.

* श्री गजानन महाराज यांच्या विषयी काही विशेष :-

श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते (आहेत) आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच म्हणावे लागेल. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात, असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. सर्व भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करतात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.

* शरीरयष्टी :-

सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देह चर्या. लांब लांब पावले टाकीत सदान्‌कदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे..

* अन्नसेवन :-

महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती.

गजानन महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा , हिरव्या मिरच्या , पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन - चार दिवस उपाशी राहावे . भक्तांकडून येणारेपंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही सेवन करावे. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.

मुळ्याच्या शेंगा , हिरव्या मिरच्या , पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात . गजानन महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते . चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत,

* गजानन महाराजांचा द्रष्टेपणा :-

प्रकट दिनीच गजानन महाराजांनी अन्न आणि पाणी वाया घालवू नका, असा संदेश दिला. त्यांच्या या शिकवणुकीची आवश्यकता आज भासतच आहे. संत किती द्रष्टे असतात ? याचीच ही प्रचीती आहे.

* सर्व विषयांत पारंगत असणारे श्री गजानन महाराज :-

गजानन महाराजांना मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत आदी भाषा अवगत होत्या, तसेच सर्व विषयांचे ज्ञानही होते. समोरच्या व्यक्तींची योग्यता ओळखून गजानन महाराज त्या व्यक्तीशी संभाषण करत असत. खरा जिज्ञासू समोर आल्यास त्याची जिज्ञासा त्यांच्याकडून शमवली जात असे. कला आणि संगीत यांचीही त्यांना आवड होती. ते विविध रागांत स्वतः भजने आणि पदे म्हणत असत. त्यांना गातांना पाहून खरा गायकही प्रभावित होत असे. त्यांचा वेद आणि ऋचा यांचाही दांडगा अभ्यास होता.

* गजानन महाराजांच्या आवडत्या गोष्टी :-

भोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो रे । चंदन, चावल, बेलकी पातियां शिवजीके माथे धरो रे ॥ हे संत मीराबाईचे पद महाराजांना फारच आवडायचे. हेच पद ते सतत म्हणायचे.महाराजांना लाकडी पलंगावर बसायला फार आवडत असे; म्हणून शेगावी त्यांचा हा पलंग संस्थानाकडून भक्तांच्या दर्शनार्थ ठेवला आहे. गण गण गणांत बोते असे ते सतत गुणगुणायचे; म्हणूनही लोक त्यांना गजानन महाराज असे म्हणतात.

* भक्तांच्या उद्धारासाठी गावोगावी भ्रमंती करणे :-

भक्तांच्या उद्धारासाठी त्यांची गावोगावी सारखी भ्रमंती चालूच असायची. कुणीही त्यांना आपल्या घरी थांबवून ठेवू शकत नसे.

* गजानन महाराजांनी केलेले विविध चमत्कार :-

गजानन महाराजांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनात अनेक चमत्कारांचा अनुभव अनेकांनी वेळोवेळी घेतला आहे. दुखण्यातून बरे करणे, कोरड्या विहिरीला पाणी आणणे, कावळ्यांना पुन्हा न येण्यास सांगणे, आगगाडी रोखून धरणे, भक्तांना नर्मदा नदीचे दर्शन घडवणे, महारोग्याचा रोग बरा करणे, द्वाड गाय आणि घोडा यांना शांत करणे, भक्तांना विठ्ठलाचे अन् रामदास स्वामींचे दर्शन घडवणे, पितांबर या शिष्याचा उद्धार करणे, वाळलेल्या आंब्याच्या झाडास हिरवी पाने आणणे, जळत्या पलंगावर बसणे, मधमाशांनी चावा घेऊनही अंग सुरक्षित असणे, ब्रह्मगिरीच्या गोसाव्याचे गर्वहरण करणे, ऊसाच्या काठीचा मार सहन करणे, पहिलवानाला पाय उचलू न देणे, चिलीमसमोर नुसती काडी धरताच चिलीम पेटणे, असे चमत्कार भक्तांनी अनुभवले आहेत.

* देश-विदेशातील भक्तांना गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाची अनुभूती देणारी विदर्भाची पंढरी म्हणजे शेगाव :-

श्री गजानन महाराजांच्या संदर्भात लक्षावधी लोक प्रतिदिन अनुभूती घेत असल्यानेच त्यांच्या दर्शनार्थ शेगावात भक्तांची मुग्यांसारखी गर्दी होत आहे. विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विदेशातही महाराजांचे भक्त त्यांच्या कृपावर्षावाचा नित्य अनुभव घेत आहेत. हीच खरी लीला ! त्यामुळे आजही शेगावचे गजानन महाराज मंदिर हे विदर्भाची पंढरी म्हणून गणले जाते. शेगावी जाताच श्री गजानन महाराजांच्या चरणी मस्तक विनम्र होते. गजानन महाराज की जय असा जयघोष करून लोक स्वतःला धन्य समजतात......

✍️ मोहन चौकेकर

*॥ गण गण गणांत बोते ॥*

*॥श्री जय गजानन ॥*🙏🙏🌹🌹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या