💥शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पोलिसांच्या वेशात येऊन अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा केला प्रयत्न.....!


💥अटकेनंतर पोलिस स्थानकात रविकांत तुपकरांचे अन्नधान्य आंदोलन ; बातमीस मज्जाव पत्रकारांचे पोलिस स्टेशनमसमोर ठिय्या आंदोलन💥 

✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा : कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेलं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर भूमिगत झाले होते. आज आंदोलन सुरू होताच तुपकर अचानक प्रकटले. पोलिसांच्या वेशात आलेल्या तुपकर यांनी आंदोलनात येऊन अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात सहभागी झालेल्या आई आणि पत्नीसमोरच तुपकर यांनी हे कृत्य केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळळा. परंतु, तुपकर यांच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड, संताप आणि तळतळाट निर्माण झाला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू होताच रविकांत तुपकर या आंदोलनात सहभागी झाले. ते पोलिसाच्या वेशात होते. यावेळी रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवत अंगावर पेट्रोल घेतलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आई आणि पत्नीसमोरच रविकांत तुपकर यांनी अंगावर पेट्रोल घेतलं. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी लगेचच रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलं.

* शेतकऱ्यांना गोळ्या घाला :-

यावेळी रविकांत तुपकर प्रचंड संतापले होते.  आम्हाला गोळ्या घाला. शेतकऱ्यांना गोळ्या घाला. आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर आम्हाला मारून टाका. हे कसलं सरकार आहे. या सरकारला जनतेचं काही पडलेलं नाही. शेतकऱ्यांचं काहीही घेणंदेणं नाही. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जात आहे, असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला.

* सरकारला लाजा वाटत नाही :-

तर, या सरकारला लाजा वाटत नाही. लाज नसलेलं हे सरकार आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं आहे. फक्त घोषणा देणारं सरकार आहे. हे सरकार कृती शून्य आहे, असा तळतळाट यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

* शेतकरी वर्गात चीड :-

दरम्यान, रविकांत तुपकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे बुलढाण्यातील वातावरण तापलं   होते.या वेळी शेतकरी वर्गात चिड निर्माण झाल्याचे दिसून येते होते.

* आधीच दिला होता इशारा :-

दरम्यान रविकांत  तुपकर यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला आत्मदहनाचा इशारा दिला होता. कापूस, सोयाबीनला चांगला भाव द्या, पीक विम्याची रक्कम द्या, अतिवृष्टीची रक्कम द्या आदी मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. या मागण्या मान्य नाही झाल्या तर 10 फेब्रुवारी रोजी आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता.

त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह जोरदार आंदोलन केलं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात रविकांत तुपकर यांची पत्नी आणि आई सुद्धा सहभागी झाली होत्या. रविकांत तुपकर यांनी पोलिस स्टेशनमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पत्रकारांना पोलिस स्टेशनमध्ये जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला त्यानंतर पत्रकारांनी पोलिस स्टेशनमसमोर ठिय्या आंदोलन केले व पोलीस प्रशासनाचा निषेध केला.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या