💥महाशिवरात्री विशेष : तीर्थक्षेत्र/ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर बद्दल विशेष माहिती.....!


💥शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे💥

 ✍️ मोहन चौकेकर 

त्र्यंबकेश्वर (trimbakeshwar) हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे.

* भौगोलिक स्थान – (trimbakeshwar from nashik)

त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी – [[वाडा] मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरया नांवाने प्रसिद्ध आहे.

* श्री त्र्यंबकेश्वर मंदिर इतिहास – (trimbakeshwar history)

दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे. ती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे – बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे – टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी – रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या –

हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ – खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या – पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या – पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी – वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे.

नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.

“गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किर्ती ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.

येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात . गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.

या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः तांदूळ व नाचणी ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.

* शिवलिंगाचे वैशिष्टय – (trimbakeshwar temple)

या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत. ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते. मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीं चे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. 

रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात.

* त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव – (temples in trimbakeshwar) श्री त्र्यंबकराजांच्या तिनही पूजेबद्दल

श्री त्र्यंबकराजाच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे सुमारे ३५० वर्षांपासून श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे करण्यात येत आहे. श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा – अर्चन – तांत्रिक पध्दतीनुसार अखंडितपणे चालु आहे. संपूर्ण भारत वर्षामध्ये अशा प्रकारची त्रिकाल तांत्रिक – अर्चन – पूजा अन्य कोठेही होत नाही. ही पूजा श्री त्र्यंबकेश्वर येथेच होते. हे श्री त्र्यंबकेश्वरचे एक वेगळे खास वैशिष्टय समजले जाते.ह्या पूजा कौल संप्रदायानुसार अतिप्राचीन काश्मिरी शैवागम शास्त्रानुसार परंपरेने चालत आलेल्या असून या पूजा पध्दतीचा मुठ उगम काश्मिरमध्ये झाला आहे. इ.स. पूर्व सुमारे २००० वर्षांपासून या कौल संप्रदायाचा उगम झालेला आहे. यामध्ये कुल अधिक अकुल म्हणजेच कौल.

शिव आणि शक्ति यांचा एकत्रित अभ्यास व उपासना करून मानवाचे अंतिम ध्येय म्हणजेच परमेश्वर प्राप्ती हा ह्या उपासनेचा मुख्य उद्देश आहे. या साधनेत शिवोभुत्वा शिवंयजेत म्हणजेच साधक स्वत: शिवरुप होऊन स्वत:चीच परमेश्वर म्हणून पूजा करून घेत असतो. वसुगुप्त नावाच्या परम शिवभक्ताला श्री. शिवांनी दृष्टांत देऊन हिमालयातील एका शीलेवर ज्ञान असल्याचे सांगितले. तेथे सांगितल्याप्रमाणे वसुगुप्त गेले असतांना त्यांना शीलेवर लिहिलेले ज्ञान प्राप्त झाले. ते ज्ञान आज स्पंद करिका म्हणून प्रसिध्द आहे. हेही ज्ञान याच कौल संप्रदायातील असुन या स्पंद कारिकेमध्ये आध्यात्मशास्त्राचे अत्यंत गुढ असे ज्ञान दिलेले आहे. जिज्ञासूंनी जरूर स्पंद करिकेचा अभ्यास करावा.पेशवे काळापासून पेशव्यांनी ह्या त्रिकाल पूजा चालू राहण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानची निर्मिती केली, व ह्या पूजा अखंडित चालू राहण्यासाठी व्यवस्था लावली.

पेशव्यानंतर इंग्रंज सरकार व भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ह.या त्रिकाल पूजा परंपरेने अखंडितपणे चालू आहेत. ह्या पूजेमध्ये प्रात:काळची पूजा दशपुत्रे घराणे, माध्यान्ह काळची पूजा शुक्ल घराणे व संध्याकाळची पूजा तेलंग घराणे यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेल्या आहेत. ह्या पूजेमध्ये तिनही वेळेस देवस्थानतर्फे नैवेद्य तसेच पूजा साहित्य व शार्गिद यांची व्यवस्था केली असून ग्रहण, महाशिवरात्री, वैकुंठ चर्तुदशी इ. पर्व काळात विशेष पूजा करण्यात येतात.संस्थानचे उत्सवचैत्रचैत्र पाडव्यास पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची(trimbakeshwar) विशेष पूजा असते.

ही पूजा विश्वस्त करतात. सायंकाळी देवाची स्वारी असते. संस्थानमध्ये गुढी उभारतात. तसेच ग्रामजोशी पंचांगवाचन करतात. वैशाख तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस मंदिरात असलेला हर्ष महाल उघडला जातो. श्रावण महिन्यात नागपंचमी व नारळी पौर्णिमेस देवास पोशाख असतो. पिठोरी अमावस्येला बैलांची मिरवणूक काढली जाते. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला विष्वस्तांकडून पार्थिव गणेश मुर्ती बसविली जाते, व मूळ नक्षत्रावर गणेश विसर्जन केले जाते.

अश्विन शुध्द अष्टमीस भुवनेश्वरी, कोलंबिका, निलंबिका इ. देवीस साडी, चोळी असते. विजयादशमीस शस्त्र व अवांतर देवता पुजन असते. पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची(trimbakeshwar) विश्वस्तांच्या हस्ते पूजा असते. सायं. ४ वाजेला देवाची स्वारी सिमोल्लंघनाकरिता निघते. नरकचतुर्थीचे दिवशी पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातुन असते. लक्ष्मीपूजनाचे दिवशी सायंकाळी संस्थानमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते.

कार्तिक शु. प्रतिपदेस पाडव्याच्या दिवशी पहाटे पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातुल केली जाते. सायंकाळी ५ वाजेला देवाचा सुवर्ण मुखवटा मंदिरात पिंडीवर ठेवला जातो. देवास पोशाख असतो. कार्तिक त्रयोदशी, चर्तुदशी व पौर्णिमा हे तीन दिवस किर्तन असते. वैकुंठ चर्तुदशीचे दिवशी रात्री देवाची विशेष पूजा असते.

पौर्णिमेच्या दिवशी सांय. ४ वाजता श्री त्र्यंबकराजाची रथातून मिरवणूक निघते. कुशावर्त तीर्थावर पूजा असते. रथ मंदिरात परत आल्यावर सायंकाळी ७.३० वाजेला दिपमाळेची पूजा करून पेटवली जाते. हीपूजा श्री. रूईकर सांगतात. माघ शुध्द पंचमी – वसंत पंचमीस देवास पोशाख असतो. महाशिवरात्रीचे दिवशी दुपारी ३ वाजेला देवाची पालखी संपूर्ण गावातून मिरविली जाते. रात्री १० ते १२ किर्तन असते. फाल्गुन पौर्णिमेस होलिकापूजन केले जाते. धुलिवंदनाचे दिवशी देवास पोशाख असतो. रंगपंचमीचे दिवशी देवास रंग लावला जातो.याप्रमाणे दर सोमवारी श्री त्र्यंबकेश्वराची पालखीतून मिरवणूक काढून कुशावर्त तिर्थावर पूजा होत असते.

* कुंभमेळा – (trimbakeshwar kumbhmela)

भारतात कुंभपर्व चार ठिकाणी साजरे केले जातात. हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन व त्र्यंबकेश्वर, नाशिक. याविषयीची अख्यायिका अशी….देव व दानवांनी समुद्र मंथन केले. त्यावेळी त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा ते मिळविण्यासाठी देव व दानवांमध्ये युध्द सुरू झाले. इंद्राचा मुलगा जयंत अमृत कलश घेऊन पळू लागला.

दानवांनी त्यांचा पाठलाग केला. या झटापटीत अमृत कलश पृथ्वीवर चार ठिकाणी ठेवला गेला. ज्या चार ठिकाणी अमृत कलश ठेवण्यात आला तीच ठिकाणे कुंभमेळयाची होत. या प्रसंगी अमृत कलशाचे फुटण्यापासून सूर्याने रक्षण केले. दैत्यांपासून गुरूने रक्षण केले. अमृत सुकू नये म्हणून चंद्राने काळजी घेतली. इंद्रपुत्र जयंताने स्वत:च अमृत पिऊ नये यासाठी पहारेदारी शनीने केली.

सूर्य, चंद्र व बृहस्पती अमृत कलशाच्या रक्षणाचे वेळेस ज्या ज्या राशीमध्ये होते ती ती वेळ पुन्हा आली की त्या त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. याविषयी स्कंदपुराण, ब्रम्हपुराण व पद्मपुराण यांमध्ये माहिती दिली आहे. हरिद्वार, अलाहाबाद, किंवा उज्जैन याठिकाणी फक्त कुंभमेळा म्हटले जाते. परंतु ज्यावेळेस कुंभमेळा त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे भरतो त्यावेळेस गुरु, सूर्य व चंद्र ही तीनही ग्रह सिंह राशीत असतात म्हणून यास सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात.

गुरू ने सिंह राशीत प्रवेश केल्यापासून सिंह राशी पार करेपर्यंतचा तेरा महिन्याचा कालावधी सिंहस्थ कुंभमेळा म्हणून ओळखला जातो. व ज्या वेळेस तिन्ही ग्रह सिंह राशीत असतात. त्यावेळेस अशी ग्रहस्थिती श्रावणी अमावास्या अर्थात पोळयाच्या दिवशी असते तो दिवस महापर्वणी म्हणून ओळखला जातो.

सिहस्थ पर्वकाळात गोदावरीत स्नान करणे विशेष पुण्यकारक आहे. सिंहस्थ काळात गोदावरीत एक स्नान केल्याने साठ हजार वर्षे गंगेत स्नान केल्याचे पुण्य लाभते. नर्मदेच्या तीरावर तपाचे, कुरुक्षेत्रावर दानाचे व गंगेकाठी मरणाचे जे पुण्य असते ते सर्व गौतमी गंगेच्या स्नानाने मिळते. गंगा गोदावरीचे अवतरण माघ शुध्द दशमीला सिंहेचा गुरू असतांना झाले आहे. गौतमांना गोहत्येच्या पातकापासून मुक्ती दिल्या नंतर गंगा परत मुळस्थानी म्हणजे शंकराच्या जटेत निघून जात होती परंतु लोकांच्या कल्याणाकरिता तिने पृथ्वीवरच रहावे असे शंकरांनी सांगितले.

लोकांचे पाप दूर करून मला मलिनता येईल तेव्हा मी काय करावे असे गोदावरीने विचारताच शंकरांनी सर्व नद्या तीर्थ सरोवरे व ऋषीमुनींना आज्ञा केली की सध्या सिंह राशीस गुरू आहे तोपर्यत तुम्ही सर्वांनी याठिकाणी वास करावा. त्याप्रमाणे सर्वांनी कबूल केले की सिंहेचा गुरू असेपर्यंत आम्ही सर्व येथे राहून रोज गोदावरीत स्नान करून त्र्यंबकराजाचे दर्शन पूजन करू. त्याप्रमाणे ती प्रथा आजही चालू आहे. सर्व साधू महात्मे पर्वणीचे दिवशी कुशावर्तावर स्नान केल्यानंतर श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शनास जात असतात. इतर तीन कुंभमेळयाचे ठिकाणी फक्त स्नाने केली जातात. परंतु येथे स्नानानंतर त्र्यंबकेश्वराचे(trimbakeshwar) दर्शनाची परंपरा आहे.

आद्य शंकराचार्यांनी सर्व साधुंचे संगठन केले त्यानंतर एकुणच व्यवस्थेकरिता आखाडयांची स्थापना करण्यात आली. पुढे हिंदू धर्मावर मुसलमानांचे आक्रमण सुरु झाल्यावर त्यास प्रतिबंध करण्याकरिता सन्याशांनी शस्त्र हाती घेतले व ते नागा अवस्थेत विचरण करू लागले. आजही नागा संन्याशी त्र्यंबकेश्वरी(trimbakeshwar) पर्वणीच्या काळात शाही स्नानाकरिता कुशावर्तावर दिंगबर आखाडा, निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा इ. सात संन्याशांचे आखाडे तसेच बडा उदासी, व निर्मळ आखाडा याप्रमाणे सांधुचे आखाडे आहेत.

पहाटे प्रथम नागा संन्याशांची शाही येते. त्यानंतर दुसरी शाही नागा संन्याशांचीच असते. नागा संन्याशी सकाळी सूर्योदयापूर्वी शाही स्नाने व दर्शन करुन आपापल्या आखाडयात परततात. सध्या बैरागी कुशावर्त तिर्थावर शाही स्नाना करिता येत नाहीत परंतु पूर्वी येत असत. त्याकरिता सकाळी ८ ते १० ची वेळ आजही राखून ठेवण्यात आलेली आहे.

त्यानंतर बडा उदासी नंतर नवा उदासी हे स्नाने करतात. शेवटी निर्मळ आखाडा शाही स्नानाकरिता येतो. दुपारी बारा वाजेनंतर सर्व भाविकांना स्नानाची परवानगी दिली जाते. सिंहस्थ काळात कुशावर्त तिर्थावर स्नानाबरोबर श्राध्दाचे देखील विशेष महत्व आहे. प्रभु श्री. रामचंद्र वनवासात आले असता सिंहस्थ कालावधीत कश्यप ऋषींनी त्र्यंबकेश्वरी(trimbakeshwar) जाऊन राजा दशरथाचे श्राध्द करण्यास सांगितले असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. गंगेच्या उगमापासून नांदेड आब्जकतीर्थ तसेच शेवट राजमहेंद्री पर्यंत संपूर्ण गोदापात्रात स्नानाचे महत्व आहे. त्या त्या विभागातले लोक जवळच्या क्षेत्री जाऊन गोदास्नानाचे पुण्य पदरात पाडून घेत असतात.

त्र्यंबकेश्वरला कसे जाणार – (trimbakeshwar in nashik) हवाईमार्ग – जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी.रेल्वेमार्ग – जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर.बसमार्ग – मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे – त्र्यंबकेश्वर(trimbakeshwar) २०० कि.मी नाशिक-त्र्यंबकेश्वर(trimbakeshwar) २९ कि.मी.नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर(trimbakeshwar) अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.

त्र्यंबकेश्वर(trimbakeshwar) हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला(trimbakeshwar) जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात. तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या