💥जमियतच्या शिष्टमंडळाची कारंजा पोलीस स्टेशनला भेट....!


💥निरपराध लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या बाबत दक्षता घेण्याची केली मागणी💥 

(फुलचंद भगत)

वाशिम:-रझा अकादमीच्या आवाहनावरून १२ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान काही उपद्रवी तत्वांनी शहरातील ३ दुकानांवर दगडफेक करून कारंजा शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असून या कारवाई दरम्यान कोणत्याही निरपराध व्यक्तीला जाच सहन करावा लागू नये, यासाठी कारंजा जमियत उलेमा-ए-हिंदच्या शिष्टमंडळाने कारंजा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आधारसिंग सोनोने यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच निरपराध लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या बाबत दक्षता घ्यावी अशी विनंती केली. या वेळी शिष्टमंडळात समाविष्ट समाजाचे नेते मो.युसुफ पुंजानी यांनी कारंजा शहर हे शांतता व बंधुभावाचे शहर असल्याचे सांगितले. तसेच असामाजिक तत्वांकडून शहराची शांतता व बंधुभाव बिघडविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे या अप्रिय घटनेला नियंत्रित करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशा परिस्थितीत शहरातील हिंदू मुस्लीम नेत्यांची संयमी व समजूतदार वृत्तीने काम करावे जेणेकरून शहरात शांतता,धार्मिक सलोखा,सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे वातावरण अबाधित राहील असे ते म्हणाले. तर ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी म्हटले की,  खोडकर,गुन्हेगार घटकांशिवाय, निष्पाप व निरपराध व्यक्तीला पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. अशी ग्वाही दिली. या वेळी मो. युसुफ पुंजानी यांच्यासह जमियत उलेमा-ए-हिंदचे कारंजा तालुकाध्यक्ष मौलवी इमदाद खान,शहर सचिव प्रा.ए.एस.शेख, मौलवी मजहर,मौलवी अ.मजिद रशीदी कारंजवी,हाफिज सय्यद अहमद,मौलवी फिरोज, जाकीर शेख आदी उपस्थित होते.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या