💥सामाजिक अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे 'मी संदर्भ पोखरतोय'


💥त्यातल्या सर्वच कविता सामाजिक राजकीय व्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत💥

       समकालीन वास्तवात सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक अंगाला भेटणार्‍या निरनिराळ्या अवस्थांच्या कविता काळजाला स्पर्श करतात तेव्हा मानवी मन अस्वस्थ होऊन जातो अशाच कवितांचा काव्यसंग्रह म्हणजे अमरावती जिल्ह्याचे प्रसिद्ध कवी पवन नालट यांचा मी संदर्भ व करतोय हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन पुणे यांनी पहिली आवृत्ती 1 फेब्रुवारी 2019 रोजी प्रकाशित केली असून प्रस्तावना दगो काळे यांची लाभली आहे या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर माणसाच्या मनाचा पक्षी अनेक जाणिवांचा अर्थ शोधणारा नावाला साजेसे संदर्भ पोखरणारा आहे या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ 280 रुपये असून त्यातल्या सर्वच कविता सामाजिक राजकीय व्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.

           कवी पवन नालट यांच्या सर्वच कविता माणसाला विचार करायला लावणारे आहे सामाजिक-राजकीय ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे आहे ती शिक्षणव्यवस्थेतील भीषण विदारक ्पष्ट करणार्‍या आहेत राजकीय व्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत वास्तवाच्या जाणिवेतून अस्तित्वाचा अर्थ शोधणारे आहेत कवी पवन नालट यांच्या सर्वच कविता मुक्तछंदात असल्यातरी सुंदर व अर्थ शोधणाऱ्या आहेत माणसाला एक माणूस म्हणून विचार करायला लावणारे आहे.



            मी संदर्भ पोखरतोय

            माझ्या मनाचा 

            असंख्य विचारांचा 

             संदिग्धतेचा

             मी निरभ्र होतोय 

             निर्विकार होतोय 

             तळ शोधतोय

             न जमणाऱ्या 

             तडजोडीचा....!!


        असंख्य विचारांचा, संदिग्धतेचा संदर्भ शोधणारा कवी पवन नालट संदर्भ शोधता शोधता निरभ्र होतोय.निर्विकार होतोय, तळ शोधत राहतोय न जमणाऱ्या तडजोडीचा त्यासाठी तो राबतोय,करपतोय, हरवतोय,जगतोय एखाद्या श्वापदाच्या सारखा. वरवर दिसणारी शांतता कवीला स्वस्थ बसू देत नाही कवीच्या आत मध्ये वादळ उठलेले आहे. त्याला कुठला संदर्भ लागत नाही त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न आहेत. जाणिवांच्या विळख्यात कवी जाळं विनतोय.न  उमजणाऱ्या संदर्भाचे. संवेदनाहीन भावविश्वाची कारणमिमांसा वरील ओळींतून कवी करण्याचा प्रयत्न करतो.


              मी जगतोय स्वातंत्र्यात 

              बघतोय गुलामी 

              स्वातंत्र्याची 

              मला नाही हक्क 

              इथल्या व्यवस्थेविरूध्द बोलण्याचा 

              तरी मी अभिव्यक्तीच्या 

             अधिकाराची मालकी 

            खिशात घेऊन फिरत असतो 


         आज स्वातंत्र्य मिळून सुद्धा गुलामी भोगत आहेत काहीजण इथल्या व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही. इथल्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही आणि बोललं तर संध्याकाळपर्यंत बोलणारा जिवंत राहील याची गॅरंटी नाही तरीसुद्धा अभिव्यक्त होण्यासाठी गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी कवी अधिकारांची मालकी खिशात घेऊन फिरतो. लोकांचा प्रामाणिकपणा मोजत असतो. तिथल्या अर्थकारणाशी, समाजकारणाची, संस्कृतीशी शब्दरूपाने शस्त्र उठवत लेखणीच्या माध्यमातून कवितेच्या रूपाने व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवत असतो. कारण कवीने अजून आत्म्याचा लिलाव केला नाही एकमेकांचा चोंमडेपणा करणाऱ्या भ्रष्टाचार उराशी कवटाळून माणुसकीचा खोटा आव आणणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध कवी पवन नालट वरील ओळीतून प्रहार केल्याशिवाय रहात नाही.


              कवीला लावता येत नाही

              संवेदनाच नेलपॉलिश

              शिवता येत नाहीत 

              उसवलेल्या काळजाचे टाके

              कपाळावर लावता येत नाही 

              आंदोलनाचा काळा बुक्का 

               तो वैशाख नसतो 

                तो श्रावण नसतो

                तो नसतो भैरवीतली आर्तता 

                व्यवस्थेच्या पायातले साखळदंड 

                शब्दांतून शस्त्र 

                पेरणारा कवी 

                मातीतून महावस्त्र देत असतो

                मानवतेच्या आरस्पानी देहाला....


           कवी कसा असावा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे कवी पवन नालट होय.कवीचं काळीज किती संवेदनशील असतं.कवी विद्रोही असतो.कवी संवेदनशील असतो. कवी अन्यायाविरुद्ध शब्दाच्या शस्त्राने प्रहार करणारा असतो. कवी वैशाख किंवा श्रावण नसतो. कवी व्यवस्थेच्या पायातील साखळदंड शब्दांचे शस्त्र करून पेरणारा,मातीतून महावस्त्र कवी मानवाला देत असतो. असा गहन अर्थ असणार्‍या, मानवाच्या थेट काळजाला भिडणार्‍या कविता कवी पवन नालट यांच्या आहेत.

        मी संदर्भ पोखरतोय या काव्यसंग्रहात एकूण ६० कविता माणसाच्या मेंदू वरची मरगळ झटकणा-या, माणसाला विचार करायला लावणार्‍या,व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणाऱ्या, भ्रष्ट, लाचारी,गरिबी, गुलामीची चिरफाड करणाऱ्या, शब्दाशब्दांतून विद्रोह करणार्‍या,स्पष्टवक्त्या आहेत. प्रत्येक कवीने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह मी संदर्भ पोखरतोय हा आहे. शब्द न शब्द थेट काळजाला भिडणारा आहे.

       कवी पवन नालट यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!

       पुस्तक मागवण्यासाठी कवीचा मो.नं ९९६०३९०७५३

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम

मो.९७६७६६३२५७


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या