💥सहकार क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध - ना.धनंजय मुंडे


◾शेतकरी कापूस प्रक्रीया सहकारी संस्थेच्या अद्ययावत जिनींग व प्रेसींग फॅक्टरीचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उदघाटन◾

💥पश्चिम वाहिनीचे पाणी मराठवाड्यात वळवले तर कायमस्वरूपी पाणीटंचाई मिटेल -आ.प्रकाशदादा सोळंके

परळी l प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात अनेक सहकारी संस्था उदयास आल्या आणि काही कालावधीनंतर त्या बंदही पडल्या. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी सहकार क्षेत्र महत्वाचे आहे, त्यामुळे सहकारातील संस्थांचे उत्थान व्हायला हवे. मराठवाड्यातील सहकारी संस्थांना नवसंजीवनी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. ज्या संस्थेचा शुभारंभ स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या हस्ते 30 वर्षांपूर्वी झाला होता आज त्यांच संस्थेचा शुभारंभ पुन्हा नव्याने माझ्या हस्ते होत आहे हा नियतीचा वेगळाच खेळ असून हे माझे भाग्य आहे असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. तर माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके म्हणाले की, मराठवाड्यातील पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवायचा असेल तर पश्चिम वाहिनीचे समुद्रात जाणारे पाणी मराठवाड्यात वळवायला हवे. यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. याबाबत मी स्वतः राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. शेतकरी कापूस प्रक्रीया सहकारी संस्थेच्या अद्ययावत जिनींग व प्रेसींग फॅक्टरीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी विचार व्यक्त करतांना ते बोलत होते.

टोकवाडी, ता.परळी वैजनाथ येथे शेतकरी कापूस प्रक्रिया संस्थेच्या अद्ययावत अशा जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचे उदघाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस फित कापून आणि श्रीफळ वाढवून उभारण्यात आलेल्या माशीनरीच्या चाकांना गती देण्यात आली. त्यानंतर शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी मंत्री आ.प्रकाशदादा सोळंके यांची उपस्थिती होती. आ.संजय दौंड, माजी आमदार विजयराव गव्हाणे, जेष्ठ नेते बाबुराव मुंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी बीड जिल्हा मजूर संस्थेचे अध्यक्ष बन्सी अण्णा सिरसाट, दादासाहेब मुंडे, वैद्यनाथ देवल कमिटीचे सेक्रेटरी राजेश देशमुख, जि.प.गटनेते अजय मुंडे, मार्केट कमिटीचे सभापती अ‍ॅड. गोविंदराव फड, प.स.सभापती बालाजी मुंडे, कापूस पणन महासंघाचे संचालक भरत चामले, रणजित चाचा लोमटे, बालासाहेब सोळंके, गोविंदराव देशमुख, संभाजीराव शेजुळ, चंद्रकांत शेजुळ, प्रा.गंगाधर शेळके, रामकीशन नादरगे, प्रकाश सोळंकी, डॉ.सुरेश चौधरी, लक्ष्मणराव पौळ, अ‍ॅड.अनिल मुंडे, व्यंकटेश शिंदे, सूर्यभान नाना मुंडे, बहादूर भाई, ज्ञानोबा माऊली गडदे, शेख आयुब भाई, राजेभाऊ पौळ, मोहनराव सोळंके, राजेभाऊ काळे, अ‍ॅड.किशोर गिरवलकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. याचबरोबर बीड-लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यातील 45 जिनिंगचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेतकरी कापूस सहकारी संस्था या संस्थेची नोंदणी 1988-89 साली झालेली आहे. अकरा झोनपैकी राज्यातील खरेदीत सदैव प्रथम असणार्‍या परळी झोनमध्ये बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होतो. सुरूवातीच्या काळात या संस्थेकडे 12 डिआर मशिन होते, आता 36 डीआर या अद्ययावत मशीनची उभारणी करण्यात आली आहे. त्यावेळी कापसाची रूई परभणी येथे प्रेसिंगसाठी पाठवावी लागत असायची. मध्यंतरीच्या काही कालावधीसाठी कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदी बंद केली होती, परंतू 2011-12 पासून ही खरेदी पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आलेली आहे शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अद्ययावत अशा जिनींग व प्रेसींग फॅक्ट्रीचे आज नव्याने उदघाटन होत आहे ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे असे म्हणत माजलगाव मतदारसंघ आणि परळी मतदारसंघात विकासाचा सुवर्णमध्य साधण्यासाठी ना.धनंजय मुंडे आणि आ.प्रकाशदादा यांना एकाच व्यासपीठावर आपण बोलावले असल्याचे मत अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. संयोजकांच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष नागोराव देशमुख, इंजि.सत्यजित सोळंके, संस्थेचे चेअरमन अ‍ॅड.अमोल सोळंके, अ‍ॅड.सचिन सोळंके, बालासाहेब मुसळे आदींनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दत्तात्रय काळे व धनंजय आरबुने यांनी केले तर अ‍ॅड.रणजित सोळंके यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या