💥कार्यक्रमास कृषीमंत्री दादाजी भुसे व राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती💥
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि कृषीमंत्री दादाजी भुसे व राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत आज कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी महाडीबीटी पोर्टलचा शुभारंभ आज करण्यात आला.
-
शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ केवळ एकाच ऑनलाईन अर्जावर देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. या अन्नदात्याला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.
-
-
गडचिरोलीच्या अनिल एलावार या शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीतून उत्पादित केलेल्या शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी आपण तत्काळ मान्य करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रयोगशीलतेने शेतकरी नवीन उपक्रम राबवत असतील तर त्याला प्रोत्साहन देणारे हे सरकार आहे.
-
आता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. कमी जागेत अधिक उत्पादन घेणारे, अत्याधुनिक पद्धतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शेती करणारे शेतकरी आपल्याकडे आहेत. त्यांच्या या मेहनतीला शाश्वती देण्याचे काम करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी सांगितले.
-
शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोलणारा, बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानांवर धाडी टाकणारा कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या रुपाने राज्याला मिळाला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.
0 टिप्पण्या