परभणी/लॉक-डाऊन काळात गेल्या दोन महिन्यांपासून जप्त करण्यात आलेली जवळपास दोन हजार दुचाकी, चारचाकी वाहने सोडण्याचा निर्णय पोलिस दलाने घेतला असून मंगवार दि.१९ मे २०२० पासून ही वाहने क्रमाने सोडली जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक वाहनधारकांना किमान 200 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
२४ मार्च पासून शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शहर पोलिस वाहतुक शाखेसह पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी विनाकारण शहरात फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करीत त्यांची वाहने जप्त केली होती. या कारवाईत आतापर्यंत १ हजार ७५८ मोटारसायकली,१५७ चारचाकी वाहने व काही ऑटोरिक्षां जप्त करण्यात आल्या होत्या. संबंधीत वाहनधारकांचा विचार करून पोलिस दलाने ती वाहने संबंधितांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. मोटारवाहन कायद्यानुसार कमीत कमी २०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. ही वाहने सोडतांना वाहनाच्या अखेरच्या नंबरवरून ती क्रमाने दिली जाणार आहेत. सुरूवातीस अखेरचा नंबर शुन्य असलेल्या वाहनांपासून अखेरचा नंबर नऊ असे पर्यंतची वाहने २३ मे पर्यंत क्रमाने सोडली जाणार आहेत. वाहने सोडताना सोशल डिस्टन्सींग पाळले जावे, यासाठी हे वेळापत्रक आखले गेले आहे. नागरिकांनी वाहनांची कागदपत्रे दाखवून ज्या पोलिस ठाण्यात आपले वाहन जप्त झालेले आहे, तेथे तोंडाला मास्क अथवा रूमाल बांधून वाहनाच्या अखेरच्या क्रमांकाप्रमाणे दिलेल्या तारखेस हजर रहावे, वाहन कागदपत्रे दाखवून ताब्यात घ्यावे, असे आवाहन शहर वाहतुक शाखेने केले आहे.
0 टिप्पण्या