🌟आहेरवाडी शिवारातील घटना : आखाड्यावरील शेती साहित्य,खताच्या गोण्याही जळून खाक🌟
पुर्णा : पुर्णा तालुक्यात वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटामुळे शेतकऱ्यांना बागायती पिकांसह पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अन्नदाता शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अश्रू ढाळण्याची वेळ आल्याचे दयनीय चित्र पाहावयास मिळत असून तालुक्यातील आहेरवाडी शिवारात मंगळवार दि.०६ मे २०२५ रोजी झालेल्या वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटामुळे शेत आखाड्यावर विज पडून पाच जनावरे दगावल्याची दुर्देवी घटना घडली या घटनेत आखाड्यावरील शेती साहित्यासह खताच्या गोण्याही अक्षरशः जळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतकरी दिगंबरराव मोरे यांच्या शेत आखाड्यावर मंगळवारी रात्री ०९.०० वाजेच्या सुमारास वीज पडून आखाड्यावरील दोन गाई व तीन जनावरे दगावली तर पाच जनावरे गंभीर जखमी झाली. तसेच आखाड्यावरील एक लाख रुपयांच्या खताच्या गोण्या देखील अक्षरशः जळून खाक झाल्या सुदैवाने घटनास्थळावर असलेले सालगडी बचावले मात्र त्यांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत एकूण पाच लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या शेत आखाड्यावर लहान - मोठी एकूण ३३ जनावरे होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत घटनेचा पंचनामा केला. अचानक उद्भवलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त शेतकर्याला राज्य शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणीही होत आहे.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या वातावरणात सायंकाळ नंतर अचानक बदल होऊन वादळी वारा आणि अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वादळी वार्याने नुकसान होण्याच्या, वीज पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.....
0 टिप्पण्या