🌟देशातील प्रत्येक राज्यातल्या सुरक्षा यंत्रणा तपासा त्या सुसज्ज ठेवा यासाठी गृहमंत्रालयाने दिले 'मॉक ड्रिल'चे आदेश....!


🌟केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले सर्व राज्यांना आदेश🌟

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जास्तच तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादाला वेळोवेळी घातले जाणारे खतपाणी यामुळे भारताने आता पाकिस्तान विरोधात कठोर भुमिका घेतल्याचे दिसत असून केंद्रीय गृह मंत्रालयाने काल सोमवार दि.०५ मे २०२५ रोजी सर्व राज्यांना दि.०७ मे २०२५ रोजी सुरक्षा यंत्रणेचे 'मॉक ड्रिल' घेण्याचे आदेश दिले आहेत.

या 'मॉक ड्रिल' अंतर्गत राज्यांतील आपत्कालीन व्यवस्था भोंगे (सायरन) वाजवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. प्रत्येक राज्यातील सुरक्षा यंत्रणा तपासा, त्या सुसज्ज ठेवा, यासाठी हे 'मॉक ड्रिल'चे आदेश देण्यात आलेले आहेत. याशिवाय, राज्यांना हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन बसविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हवाई हल्ल्याच्या सायरनच्या बाबतीत विद्यार्थी आणि नागरिकांना बचावकार्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

सायरनद्वारे हवाई हल्ल्याचा इशारा जारी केला जाईल, शत्रूच्या हल्ल्याच्या बाबतीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर सामान्य नागरिक आणि विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण दिले जाईल, क्रॅश ब्लॅक आऊट उपायांची तरतूद, निर्वासन योजनेचे अद्ययावतीकरण आणि सराव. दहशतवादाविरोधातील भारताच्या लढाईला अनेक देशांचा पाठिंबा मिळत असून त्यामध्ये आता रशियाचीही भर पडली आहे. जपाननेही भारताला पाठिंबा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली.

💫दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दहशतवाद समर्थक युवकाचा नदीत बुडून मृत्यू :-

दहशतवाद्यांना मदत आणि आश्रय देण्याचा आरोप असलेल्या इम्तियाज अहमद या युवकाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली असता तो वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सध्या या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

💫जागतिक स्तरावर पाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न :-

भारत पाकिस्तानच्या विविध स्तरावर मुसक्या आवळत असून आता भारताने पाकविरोधात आणखी एक पाऊल उचलत जागतिक स्तरावर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अध्यक्षांची भेट घेतली आणि पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या निधीत कपात करण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे.

💫जम्मू काश्मीर राज्यातील पूंछमध्ये जेवणाच्या डब्यात आढळली स्फोटके :-

जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या लपण्याच्या जागा आणि छुपे तळ शोधून काढण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेतली असताना सूरनकोट परिसरात दहशतवाद्यांचा एक तळ सापडला असून तेथे जेवणाच्या डब्यात स्फोटके लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. यावेळी काही ठिकाणी लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक झाल्याचे समोर आले आहे. अशाच एका मोहिमेमध्ये सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या एका तळावर हल्ला चढवला. या हल्ल्यात हा तळ उद्ध्वस्त झाला असून तेथे मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आली आहेत....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या