🌟“शरदचंद्र पवार साहेबांची उपस्थिती ही आम्हा सर्वांसाठी ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत” - भरत गीते
खा.शरदचंद्र पवार साहेब यांनी संस्थापक भरत गिते यांच्याशी संवाद साधत त्यांचं कार्य, दृष्टिकोन आणि उभारणीच्या प्रवासाची सखोल माहिती जाणून घेतली. खा.शरदचंद्र पवार साहेब म्हणाले, "या ठिकाणी येण्याआधी भरत गिते यांच्याशी भेट झाली होती. त्यांनी त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती माझ्यापुढे मांडली. मी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या संस्थेबद्दल काही लोकांकडून पूर्वीही ऐकलं होतं. त्यांच्या कार्यपद्धतीनं पवार साहेब प्रभावीत झाले आणि त्यांचा प्रकल्प प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे मी आज इथे आलो आहे." पुढे बोलताना पवार साहेबांनी महाराष्ट्रातील औद्योगिकीकरणाच्या वाटचालीवर भाष्य केलं. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी उद्योग उभारले खरे, पण त्यामागचा उद्देश इंग्लंडमधील कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल भारतातून घेऊन जाण्याचा होता, असे सांगितले.
त्यांनी स्पष्ट केलं की "स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली ती यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात. त्यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी, महाराष्ट्र फायनान्स कॉर्पोरेशन, महाराष्ट्र विद्युत मंडळ यांसारख्या संस्थांची स्थापना झाली, ज्यामुळे राज्यात औद्योगिक पाया मजबूत झाला. त्यानंतर माझ्यासह वसंतराव नाईक, वसंतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वात decentralised (विकेंद्रित) औद्योगिक धोरण राबवण्यात आलं."
याच संदर्भात त्यांनी भरत गिते यांच्या प्रवासाचं विशेष कौतुक केलं. "मराठवाड्याने निजामशाहीचा संघर्ष अनुभवला आहे. परळी, बीडसारख्या भागात नैसर्गिक परिस्थितीही प्रतिकूल आहे. अशा परिस्थितीतून झगडत पुढे आलेल्या, संघर्षातून तावून सुलाखून निघालेल्या व्यक्तींमध्ये श्री. भरत गिते यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांनी जर्मनीत जाऊन तांत्रिक शिक्षण घेतलं, तेथे नोकरी केली आणि त्या अनुभवाचा उपयोग करत शून्यातून एक अत्याधुनिक प्रकल्प चाकणमध्ये उभा केला आहे. ही गोष्ट प्रेरणादायी आहे." तसेच त्यांनी उद्योग, शेती आणि आयटी क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा मागोवा घेत, पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजणगाव, शिरूर, बारामती, इंदापूर आणि भिगवन भागात झालेल्या औद्योगिक विकासाबद्दलही समाधान व्यक्त केलं. “आज या ठिकाणी मी जे पाहिलं, ते खरोखरच आशादायक आहे. श्री. भरत गिते यांचा उद्योग या भागातील तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, याची मला खात्री आहे,” असेही त्यांनी शेवटी नमूद केलं.
ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची तौरल इंडिया प्रा. लि. येथे झालेली सदिच्छा भेट ही आम्हा सर्वांसाठी ऐतिहासिक आणि गौरवाशाली असल्याचे प्रतिपादन संस्थापक भरत गित्ते यांनी व्यक्त केलं. खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचे स्वागत करताना म्हटलं, “साहेब, आपण स्वतः येथे आलात, त्याबद्दल मन:पूर्वक आभार. आजचा दिवस हे तौरल इंडियाच्या इतिहासातील एक उत्सवाचा आणि ऊर्जेचा क्षण आहे. आपल्या दूरदृष्टीतून औद्योगिक, सहकारी आणि सामाजिक क्षेत्रात जे कार्य घडलं आहे, त्यातूनच आधुनिक महाराष्ट्राची घडण झाली आहे. आपल्या निर्णयक्षम नेतृत्वाचा ठसा गेल्या ५०-६० वर्षांच्या प्रत्येक टप्प्यावर स्पष्टपणे जाणवतो.”
तौरल इंडियाच्या प्रवासाविषयी सांगताना, गिते म्हणाले की, “केवळ १० कर्मचाऱ्यांपासून २०१३ साली या कंपनीची सुरुवात केली आणि आज ती नवभारत घडविण्याच्या दृष्टीने अॅल्युमिनियम कास्टिंग पुरवठा करणारी एक विश्वासार्ह कंपनी बनली आहे. माझी जन्मभूमी मराठवाडा — ही संघर्षाची भूमी आहे, पण तितक्याच ताकदीचीसुद्धा. त्या मातीतूनच एक उद्योगपती म्हणून घडू शकलो. हे सहज शक्य नव्हतं, ती एक प्रकारची अग्निपरीक्षा होती. मात्र आपण आमच्या सारख्या तरुणांसाठी एक ‘मराठवाडा व्हिजन’ तयार केलात तर अनेक तौरल इंडिया घडू शकतात. शेवटी त्यांनी पवार साहेबांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आणि पुढील प्रेरणादायी सहकार्याबद्दल आशा व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांशी, सर्व कर्मचारी वर्गाशी संवाद साधला तसेच ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थितीमध्ये खा. निलेश लंके, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रामराव गित्ते व विविध क्षेत्रात मान्यवर उपस्थितीत होते.
"साहेब, आपण स्वतः येथे आलात, त्याबद्दल मन:पूर्वक आभार. आजचा दिवस हे तौरल इंडियाच्या इतिहासातील उत्सवाचं क्षण आहे. आपल्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक बदल घडले. आज आपण आलात यामुळे आम्हा सर्वांना नवचैतन्य, ऊर्जा व प्रेरणा मिळाली."
— श्री.भरत गीते, संस्थापक, तौरल इंडिया प्रा. लि.
"मराठवाड्यासारख्या संघर्षमय भूमीतून आलेले श्री.भरत गिते यांनी जर्मनीत ज्ञान मिळवून शून्यातून उभारलेला हा प्रकल्प आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरेल."
— शरदचंद्रजी पवार, खासदार
0 टिप्पण्या