🌟अहो आश्चर्यम गुत्तेदारापुढे अधिकारीही हतबल ? चक्क रस्त्यावरील गिट्टी पडली उघडी.....!


(सेलू ते डिग्रस या रस्त्यावर अक्षरशः उघडी पडलेली गिट्टी.)

🌟पावसाळ्याचा महिनाच बाकी असतांना डांबरीकरण नाही🌟

सेलू (दि 04 मे 2025) - सेलू ते डिग्रस जहांगीर हा रस्ता अद्यापही डांबरीकरण न झाल्याने तसाच खराब अवस्थेत असून संबंधित विभागाचे सर्वच अधिकारी गुत्तेदारापुढे हतबल झालेले दिसत आहेत.कारण इतक्या बातम्या प्रकाशित होऊन,शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनही अजून सुद्धा या रस्त्याचे डांबरीकरण कामास सुरुवात झालेली नाही.आता पावसाळ्याला फक्त काही दिवस शिल्लक आहेत.सध्या फक्त गिट्टीचा एकच थर अंथरलेला आहे.बऱ्याच डासांपासून हा गिट्टीचा थर असल्याने वाहने जाऊन ही गिट्टी सुद्धा इतरत्र पसरत आहे.यामुळे या रस्त्याने वाहन,बैलगाडी चालवणे अवघड झाले आहे.

प्रशासनाने दुर्लक्ष केलेला तालुक्यातील सेलू ते डिग्रस जहांगीर हा रस्ता केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणा व कंत्राटदाराच्या वेळकाढूपणा यामुळे अत्यंत धीम्या गतीने काम सुरू आहे.याचा त्रास मात्र सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना होत असतांनाही प्रशासनातील अधिकारी का दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न निर्माण होत आह.मंजुरीपासूनच या रस्त्याच्या कामाला केवळ चालढकल केली जात आहे.शेवटी दरवेळी या भागातील नागरिक स्वतः अधिकाऱ्यांना फोन करतात अडचणी सांगतात.नागरिकांनी फोन केल्यावर मग अधिकारी सूत्र हलवतात व रस्त्याचे काम सुरू होते.पुन्हा काही दिवसात रस्त्याचे काम बंद पडते.सध्या या रस्त्यावर केवळ गिट्टी टाकून त्यावर मुरूम टाकून दबई केली आहे.परंतु पुन्हा रस्त्याचे काम बंद पडले आहे.यामुळे या रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली आहे.यामुळे बैलगाडी,वाहने,मोटारसायकल असे कोणतेच वाहन चालवता येत नाही.सुरुवातीपासून मुरूम व गिट्टीचे कामही संथ गतीने केले आहे.यामुळे वाहनधारकांना त्रास तट होतच आहे परंतु अनेकवेळा वाहने बाजूला जाऊन अपघातही होत आहेत.संभाजीनगर येथील कार्यकारी अभियंता स्वतः दोन ते तीन वेळा या रस्त्याला भेट देऊन गेले तरीही कंत्राटदार रस्त्याच्या कामाला गती देत नाहीत.आता पावसाळा महिनाभरार आलेला असतांना अजून डांबरीकरणचा एक थर सुद्धा झालेला नाही.जर पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण न झाल्यास शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा आणखी त्रास होणार आहे.शेतात जाणेच अवघड होऊन बसणार आहे.विशेष म्हणजे कंत्राटदार कामाला उशीर करत असताना अधिकारी मात्र काही कारवाई करतांना दिसत नाहीत.या रस्त्यावरील अभियंता हे घेऊन भेट देऊन जातात पण बहुतेक तेही गुत्तेदारापुढे बोलू शकत नाहीत की काय? असा प्रश्न जनतेला पडत आहे.या भागातील शेतकरी अक्षरश चिडून तर कधी विनंतीने वारंवार फोनवर अधिकाऱ्यांना संपर्क करतात कारण शेतकऱ्यांनाच गरज आहे.प्रशासन मात्र कोणत्या मानसिकतेत आहे हेच कळायला मार्ग नाही.या कामाबाबत अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला असता केवळ आम्ही सतत संबंधित गुत्तेदाराला पत्र देत आहोत एवढेच उत्तर ऐकायला मिळते.परंतु वरिष्ठ अधिकारी यापुढे जाऊन काहीही करत नाहीत.एकप्रकारे गुत्तेदारापुढे अधिकारी देखील हतबल झाले की काय? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.सध्या केवळ एकच थर गिट्टीचा टाकला आहे.आणखी किती थर आहेत,डांबरीकरण किती थरांचे आहे याबाबत देखील स्पष्टता दिसत नाही.या कामाचा फलक सुद्धा या रस्त्यावर लावलेला दिसत नाही.अनेक समस्या या रस्त्याच्या बाबतीत असून केवळ थातुरमातुर काम होते की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.तेव्हा तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू करावे व तेही गुणवत्तापूर्ण व्हावे अशी मागणी होत आहे.

💫राजकीय इच्छाशक्तीचा अभाव :-

सेलू ते डिग्रस हा रस्ता अनेक दिवसांपासून रखडलेला आहे.खरे तर या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींनी एवढी ओरड झाल्यावर तरी या कामात लक्ष घालून तातडीने डांबरीकरण करायला लावायला पाहिजे.यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या ठिकाणी दिसत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या