🌟हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका : पार्डी पोहकर येथे वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू.....!


🌟तर जांब आंधमध्ये चौघे जण गंभीर जखमी🌟

 ✍️शिवशंकर निरगुडे (हिंगोली)

हिंगोली :- हिंगोली शहरासह जिल्हाभरात शनिवार दि.१७ मे २०२५ रोजी दुपारच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला दरम्यान सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे शेतात विज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर जांब आंध येथे चौघे जण गंभीर जखमी झाले या शिवाय हत्ता व खडकी येथे एकूण तीन गायी दगावल्याची घटना देखील घडली आहे.


हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतली असून आपत्तीग्रस्तांना तातडीने मदतीच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या आहेत हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी तीन वाजता वीजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरवात झाली. काही वेळातच पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे कळमनुरी व सेनगाव व वसमत तालुक्यात भुईमुगाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.


दरम्यान, सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे मुक्ताबाई गिरी (४०) ह्या शेतात काम करीत होत्या. अचानक विजेचा कडकडाट व वाऱ्यामुळे त्या घरी निघाल्या. मात्र याचवेळी पाऊस सुरु झाल्यामुळे त्या झाडाखाली थांबल्या. यावेळी वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. पाऊस येत असतानाही त्या घरी का आल्या नाही हे पाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय शेतात गेले असता, त्यांचा मृतदेह एका झाडाखाली आढळून आला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले आहे.

या शिवाय सेनगाव तालुक्यातील जांब आंध येथे शेतात वीज कोसळून रुख्मीना मनोहर बंदुके, अंकिता संतोष बोडखे, संतोष किशन बोडखे, नंदाबाई किसन बोडखे जखमी झाले आहेत. अंकिता बोडखे ह्या गरोदर आहेत. या सर्वांना उपचारासाठी सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. रुख्मीना यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविले आहे. तहसीलदार देवराव कारगुडे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, सेनगाव तालुक्यातील खडकी येथे एक गाय दगावली, तर हत्ता येथे गोशाळेजवळ वीज कोसळल्यामुळे दोन गायी दगावल्या आहेत. हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथे दिगंबर बेले यांच्या घरावरील टिन पत्रे उडून गेली. यामध्ये एका टीनपत्रामुळे बैल जखमी झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी माहिती घेतली असून जखमींवर तातडीने औषधोपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या