🌟छोटू कांबळे यांचा नागसेन बुद्ध विहार चिखली येथे फुले,शाहू,आंबेडकरी समाजाच्या वतीने सत्कार🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली – मेहकर तालुक्यातील माळखेड गावात एका मातंग समाजाच्या नवरदेवाला जातीय विषमतेच्या भावनेतून देवाच्या मंदिरात प्रवेश नाकारण्याच्या घटनेने सामाजिक संताप उसळला आहे. मात्र, या अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहून धाडसी नेतृत्वाचे प्रदर्शन करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार भाई छोटू कांबळे यांचा नागसेन बुद्ध विहार, चिखली येथे फुले,शाहू,आंबेडकरी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मेहकर तालुक्यात एका मातंग समाजाच्या नवरदेवाने रुढी-परंपरेनुसार देवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक मंदिर व्यवस्थापनाने “देव बाटेल” या विकृत मानसिकतेच्या आधारे नवरदेवाला प्रवेश नाकारला. दररोज उघडे राहणारे मंदिर यावेळी बंद ठेवून व्यवस्थापनाने आपला जातीयवादी चेहरा उघड केला.
या घटनेची माहिती मिळताच चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार भाई छोटू कांबळे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी नवरदेवाला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यास प्रोत्साहित केले. तसेच, समाजातील विषमता बाजूला ठेवून नवरदेवाची वरात यशस्वीरित्या पार पाडली.
भाई छोटू कांबळे यांच्या या सामाजिक कार्याबद्दल नागसेन बुद्ध विहारात चिखली येथील बौद्ध बांधवांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ऍड सि पी इंगळे हे होते तर प्रमुख उपस्थित शेतकरी संघटनेचे नेते अनिल वाकोडे, भारतीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे, समता सैनिक दलाचे मेजर विलास जाधव, गजानन गवई, वीरसेन साळवे, न. प. कर्मचारी राजू साळवे, सुरेश भंडारे यांसह इतर समाजबांधव आणि श्रामनेर भिकू उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी देशातील जातीय विषमतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. जेष्ठ वकील सि. पी.इंगळे यांनी यावेळी भाष्य करताना म्हटले की, “भाई छोटू कांबळे यांनी दाखवलेल्या धैर्याचा आणि समाजासाठी उभ्या केलेल्या आदर्शाचा अनुसरण करणे गरजेचे आहे. अशा कृती समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रेरणादायी ठरतील.
ही घटना आजही समाजात जातीय विषमता जिवंत असल्याचे दाखवून देते. मानसिकता बदलण्याची गरज अधोरेखित करत जातीयवादी विचारसरणीला विरोध करण्याचे आवाहन कार्यक्रमातून करण्यात आले. पत्रकार भाई छोटू कांबळे यांचे कार्य सामाजिक न्यायासाठी महत्त्वपूर्ण ठरले असून, त्यांच्या धाडसी भूमिकेचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या