🌟महाराष्ट्र राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न चिंताजनक : राज्यात प्रत्येक दिवसाला आठ शेतकरी करतात आत्महत्या ?


🌟ही माहिती अंशतः खरी असल्याची कबुली दस्तुरखुद्द राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली🌟

मुंबई : महाराष्ट्र राज्यात मागील  ५६ महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक दिवसाला तब्बल ८ अन्नदाता शेतकरी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची गंभीर बाब समोर आली असून ही माहिती अंशतः खरी असल्याची कबुली दस्तुरखुद्द राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत याबाबत प्रश्न विचारला होता त्यावर उत्तर देताना मंत्री जाधव म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. गेल्यावर्षी मराठवाड्यात ९५२,अकोल्यात १६८,वर्ध्यात ११२, बीडमध्ये २०५,तर अमरावती विभागात १०६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान छत्रपती संभाजीनगर विभागात ९५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ७०७ शेतकऱ्यांचे कुटुंबीय मदतीस पात्र ठरले, तर ४३३ जणांना मदत देण्यात आली.बीड जिल्ह्यात १६७ जणांना मदत देण्याबाबत मान्यता देण्यात आली, तर १०८ जणांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली. अमरावती विभागात ४४१ जण मदतीसाठी पात्र ठरले, तर ३३२ जणांना मदत मिळाली. जालना तालुक्यातील मंठा तालुक्यात एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे मंत्री जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या