🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तें वसंतराव नाईक कृषी विद्यापिठाचे कुलगुरु इंद्रमणि यांचा सन्मान....!


🌟पुण्यात सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार सोहळा संपन्न : कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा केला विशेष सन्मान🌟

परभणी :- पुण्यात पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित वार्षिक ‘सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार’ सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्यासह कृषी संशोधन व तंत्रज्ञानाच्या प्रसारात भरीव योगदान देणार्‍या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा विशेष सन्मान करण्यात आला.

            महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या मेहनतीला सलाम करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे काल रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी वार्षिक सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या  सोहळ्यास मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर कृषि मंत्री माणिकराव कोकाटे, पाणी  फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमीर खान आणि किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, सह्याद्री ऍग्रोचे विलास शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. शेतीविकास व शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी मोलाची भूमिका बजावल्याने वनामकृविचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते. कुलगुरूंनी उपस्थित राहून शेतकरी व शास्त्रज्ञांना प्रेरणा दिली. कार्यक्रमात आमिर खान यांनी वनामकृविच्या ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचे कौतुक करून शेतकर्‍यांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद केले.

             या सोहळ्यात विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्याही कृषि विकासातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला. दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात शेतकर्‍यांच्या संघर्षमय वाटचालीची, जिद्दीची आणि यशाची कथा उलगडणार्‍या प्रेरणादायी सादरीकरणांचा समावेश होता. कार्यक्रमाद्वारे राज्यातील जलसंधारण आणि शाश्‍वत शेतीसाठी कार्य करणार्‍या शेतकर्‍यांच्या अथक प्रयत्नांना उचित सन्मान मिळाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यभरातील ४ हजार ३६० शेतकरी गटांचा तसेच कृषि क्षेत्रातील शास्त्रज्ञांचा विशेष सन्मान करण्यात आला.

            कार्यक्रमात विशेषतः तुरीच्या गोदावरी वाणाचे जनक डॉ. दीपक पाटील, सोयाबीन मध्ये उल्लेखनीय कार्य केलेले डॉ. शिवाजी म्हेत्रे, कापूस संशोधक डॉ. अरविंद पांडागळे, ज्वार तज्ञ डॉ. एल. एन. जावळे, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप आणि डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. प्रीतम भुतडा,  सोयाबीन तज्ञ डॉ. राजेंद्र जाधव, आणि डॉ. प्रशांत सोनटक्के यांचा सन्मान करण्यात आला. याबरोबरच कीटकशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. मिलिंद सोनकांबळे आणि डॉ. अनंत लाड यांचा यथोचित गौरव करण्यात आला. त्यांच्या संशोधनामुळे कृषि क्षेत्रात नवसंशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होण्यास मदत झाली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या