🌟उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र राज्य सरकारला सवाल🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यात गाजलेल्या मुंबईतील बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे इनकॉनटर प्रकरणाला गुरुवार दि.०६ फेब्रुवारी २०२५ रोजी वेगळीच कलाटणी मिळाली. अक्षय शिंदेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारची न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि न्यायाधीश डॉ.नीला गोखले यांच्या खंडपीठाने चांगलीच झाडाझडती घेतली. आमच्या आदेशानंतरही अक्षयच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल का केला नाही ? असा प्रश्न त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला विचारला दरम्यान हा खटला लढण्यासाठी आम्हाला धावपळ झेपत नाही त्यामुळे या खटल्यातून आम्हाला माघार घ्यायची आहे असे अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे या चकमकीला जबाबदार पोलिसांवर कारवाई होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबईतील बदलापुरातील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कोठडीत असताना पोलिसांकडून कथीत चकमकीत ठार करण्यात आले मात्र, अक्षयला चकमकीत मारले नसून त्याची हत्या करण्यात आली असा आरोप करत अक्षयच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.या याचिकेवर गुरुवारी न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि न्यायाधीश डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे गेल्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने पाच पोलीस अधिकाऱ्यांना अक्षयच्या मृत्यूला जबाबदार ठरवणाऱ्या दंडाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. मात्र, या पोलिसांविरोधात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने खंडपीठाने नाराजी व्यक्त करत जाब विचारला.यावेळी विशेष सरकारी वकिलांनी या प्रकरणाची राज्य सीआयडी तसेच न्यायिक आयोगामार्फत समांतर चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी असल्याचे सांगितले. या युक्तिवादाची नोंद खंडपीठाने घेतली.
🌟चकमकीत ठार झालेल्या अक्षयचे आईवडील खटल्यातून माघार घेण्याच्या मनःस्थितीत :-
तथाकथित पोलिस चकमकीत ठार झालेल्या अक्षय शिंदेच्या आईवडिलांना ही केस यापुढे लढण्याची इच्छा नाही. ते खटल्यातून माघार घेण्याच्या मनः स्थितीत असल्याचे अक्षयच्या आईवडिलांच्या वकिलांनी सांगितले. आम्ही खटल्यातून माघार घेण्यामागे आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. आम्हाला सुनावणीला येण्यासाठी होणारी धावपळ व प्रवास जमत नाही. आमच्या राहण्याची कुठेही सोय नाही. त्यामुळे आम्हाला हा न्यायालयीन लढा लढायचा नाही, अशी माहिती अक्षय शिंदेच्या पालकांनी त्यांच्या वकिलांमार्फत कोर्टाला दिली. त्याची दखल घेत खंडपीठाने शुक्रवारी पुन्हा सुनावणी ठेवली आहे.
🌟अक्षय चकमक कथीत प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाई : आता कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष :-
अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी अचानक या प्रकरणातून माघार घेतल्याने कथित बनावट चकमकीला जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणावर आता उच्च न्यायालय काय भूमिका घेतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
0 टिप्पण्या