🌟परभणी महानगरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उद्या 26 जानेवारी पासून ई-कचरा संकलन अभियान सुरू होणार....!


🌟शहरातील विविध 13 ठिकाणी अस्थाई केंद्र : जनजागृतीही केली जाणार🌟

परभणी (दि.25 जानेवारी 2025) : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संरक्षण गतीविधी आणि पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी महानगरात सर्वांत मोठे ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियान राबविण्यात येणार आहे.

           या अभियानातून पाथरी रस्त्यावरील विसावा कॉर्नर जवळील संकल्प मल्टिसर्व्हिसेस, जिंतूर रस्त्यावरील विसावा चौकातील केएनपी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, जूना पेडगाव रस्त्यावरील समर्थ कॉम्प्यूटर्स,  सहकार नगरातील आकांक्षा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, दर्गा रस्त्यावरील शांती नगरातील सुयोग इंग्लिश स्कूल, जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळी शारदा महाविद्यालय, त्रिमूर्ती नगरातील राजन ईलेक्ट्रॉनिक्स, मध्यवस्तीतील छत्रपती शिवाजी चौकातील स्वाती कलेक्शन, न्यू प्रगती बुक स्टॉल स्टेडियम कॉम्प्लेक्स, स्टेशन रस्त्यावरील डॉ. हेडगेवार चौकातील चंद्रभागा कॉम्प्लेक्स मधील विनय रबर स्टॅम्प, विष्णु नगरातील क्मे इंग्लिश स्कूल, रामकृष्ण नगरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यालय, शिवराम नगरातील आप्पा पुळजकर भवनातील सेवा भारती कार्यालय या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत रविवार 26 जानेवारीपासून ई-कचरा संकलित केला जाणार आहे.

          पर्यावरण संरक्षण गतीविधी आणि पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून  निवासी सोसायट्या, व्यावसायिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये आणि कॉपॅरिट कंपन्या या अभियानात ई-कचरा संकलन केंद्र म्हणून सहभागी होत आहेत. ई-कचरा संकलनाबरोबर जनजागृतीसुध्दा केली जाणार आहे. ई-कचर्‍यामध्ये शिसे, निकेल, क्रोमिअम, कॅडमियम, पारा, कोबाल्ट यांसारखे अनेक रासायनिक घटक असतात, जे मानवी आरोग्यास अतिशय घातक आहेत, तसेच ई कचर्‍यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचाही र्‍हास होतो आहे. शास्त्रीय पध्दतीने ई-कचर्‍याची विल्हेवाट ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळेच नागरिकांनी त्यांच्या जवळच्या केंद्रांवर ई- कचरा जमा करावा, ई-कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शाश्‍वत व स्वच्छ भविष्य घडवण्यासाठी या सामूहिक प्रयत्नात नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या अभियानाद्वारे करण्यात आले आहे.

            ई-कचर्‍याच्या योग्य विल्हेवाटीमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करता येतील आणि शाश्‍वत जीवनशैलीकडे वाटचाल करता येईल. संकलित ई-कचर्‍याचे वर्गीकरण करून पुनर्वापर होऊ शकेल असे साहित्य विशेषतः फ्रिज, वॉशिंगमशीन, फॅन, मायक्रोव्हेव, टि.व्ही. वातानूकुलीत यंत्रे, सीडी, डिव्हीडी प्लेअर, होमथेटर,  लॅपटॉप, संगणक, पेनड्राईव्ह, हेडफोन, प्रिंटर्स, डिजिटल कॅमेरा, व्हिडीओ कॅमेरा, मोबाईल फोन, चार्जर, टॅबलेट, निरुपयोगी अथवा चालू स्थितीतील कोणत्याही ईलेक्ट्रीकल व ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्विकारल्या जाणार आहेत. यातील संगणक, लॅपटॉप, प्रिंटर्स वगैरे दुरुस्त करून ग्रामीण भागातील गरजू शाळा अथवा विद्यार्थ्यांपर्यंत पोचवले जाणार आहेत, बाकी सर्व ई-कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नोंदणीकृत केलेल्या रिसायकलिंग केंद्रांकडे सोपवला जाणार आहे.

            जवळील संकलन केंद्राबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी https://poornamecovision.org/events/mega-drives/eyantran-2025-largest-e-waste-collection- drivecollection-points या लिंकवर क्लिक करावे, अधिक माहितीसाठी संपर्क साधावा 9075008994, असे आवाहन करण्यात आले आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या