🌟स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड निलंबित🌟
परभणी (दि.२० डिसेंबर २०२४) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या, जिल्हा बंदच्या दरम्यान हिंसाचाराच्या व सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यू प्रकरणासह एकूण घटनांची न्यायालयीन चौकशी केली जाईल, तसेच वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केल्याबद्दल पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना चौकशी होईपर्यंत निलंबित केले जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी दि.२० डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
💥संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील तो आरोपी मनोरुग्णच :- मुख्यमंत्री फडणवीस
परभणी येथील घटने संदर्भात विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेस उत्तर देतेवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणीतील घटना अत्यंत दुर्देवी आहेत भारताच्या संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. त्यामुळे हा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही, असे नमूद केले. परभणी येथील हे कृत्य एका मनोरुग्णाने केले आहे. तो मनोरुग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवालही प्राप्त झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी, संघटनांनी तणाव कमी करण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे म्हटले.
💥परभणी शहरात कोम्बिंग ऑपरेशन नव्हे अटक सत्र ?
परभणीतील या प्रकरणात पोलिसांनी कोणतेही कोम्बिंग ऑपरेशन केलेले नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. जिल्हा बंदच्या आंदोलना दरम्यान ज्येष्ठ नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आपणास सायंकाळी या संदर्भात संपर्क साधला. परभणीत कोम्बिंग ऑपरेशन सुरु असल्याबद्दल माहिती दिली. आपण विशेष पोलिस महानिरीक्षकांशी तात्काळ संपर्क साधला. तेव्हा स्थानिक पोलिस यंत्रणेने कोम्बिंग ऑपरेशन करत नाही, असा स्पष्ट खूलासा केला. सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनांमध्ये स्पष्टपणे आढळणार्या समाजकंटकांची ओळख पटवून अटकसत्र सुरु आहे, अशी दिल्याचे ते म्हणाले. हिंसाचाराच्या एकूण घटना पोलिसांनी 51 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती दिली.
💥 परभणी हिंसाचार प्रकरणी आरोपीस सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे नव्हे ?
हिंसक घटनांच्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणास ताब्यात घेतले तो मूळ लातूरचा रहिवाशी आहे विधी शिक्षणाकरीता तो परभणीत वास्तव्यास होता. सीसीटीव्हीतील व्हिडीओ क्लिपमध्ये तो स्पष्टपणे दिसल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली न्यायालयासमोर दोनवेळा उभे केले. दोन्ही वेळी न्यायाधीशांनी सूर्यवंशी यांना पोलिसांनी मारहाण वगैरे केली आहे का अशी विचारणा केली यावेळी सूर्यवंशी यांनी स्पष्टपणे नाही असे उत्तर दिले पोलिस कोठडीतसुध्दा तो युवक असतांना त्याचे व्हिडीओ फूटेज पूर्णपणे उपलब्ध आहेत,कोणतीही मारहाण सूर्यवंशी यांना पोलिसांद्वारे झाले नाही,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करीत शवविच्छेदन अहवालात मृत्यूसंदर्भात तपशील विशद करतेवेळी वैद्यकीय अधिकार्यांनी सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता असे स्पष्टपणे नमूद केले पाठीवरील जखमा या जून्या आहेत असाही उल्लेख केला आहे.कारागृहात असतांना छातीत जळजळ होत असल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी केल्यानंतर अन्य कैद्यांनी तात्काळ तो प्रकार अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिला व त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केल्या गेले होते. त्यावेळीच ते मृत्यू पावले, असे फडणवीस यांनी म्हटले.
💥परभणी येथील घटनांमध्ये वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर : पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड निलंबित :-
परभणी येथील घटनांमध्ये पोलिस प्रशासनाने वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केल्याबद्दल निश्चितच चौकशी केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केल्याबद्दल तक्रारी आहेत त्यामुळेच अशोक घोरबांड यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले जाईल असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
💥हिंसक घटनांमधून ०१ कोटी ८० लाखांचे नुकसान :-
घटनेच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या बंदच्या दरम्यान बहुतांशी आंदोलनकर्ते हे शांततेत आंदोलन करत होते. परंतु, दोनशे ते तीनशे अतिउत्साहींनी या प्रकरणास गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. कायदा हातात घेतला. अन् तूफान दगडफेक करीत जाळपोळीचे प्रकार केले. हे प्रकार अत्यंत दुर्देवी होते. त्यामुळे प्रचंड असे नुकसान झाले आहे. सामान्य नागरीकांना विनाकारण मोठा फटका बसला आहे. या हिंसक घटनेत ०१ कोटी ७९ लाख ४०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली......
0 टिप्पण्या