🌟मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे : मतदान जनजागृती कार्यक्रमात बोलतांना स्वीप सदस्य ढाकणे म्हणाले🌟
परभणी/जिंतूर (दि.25 आक्टोंबर 2024) : लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी जागरूकतेने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन स्वीप सदस्य राजेंद्र ढाकणे यांनी केले.
भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार जिंतूर तथा जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, तहसीलदार सेलू तथा जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शिवाजी मगर, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंडे यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. त्याअनुषंगाने जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हा., संक्राळा, अंबरवाडी या भागामध्ये शुक्रवारी (दि.25) स्वीप पथकांच्या सदस्यांद्वारे पोवाड्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.
पुढे बोलतांना ढाकणे म्हणाले, जागरूक मतदार लोकशाही बळकट करतात. सक्षम लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी प्रचंड मोठी असते. मतदानाचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. तरुण मतदारांनी जागरूकतेने, जबाबदारीने आणि सजगतेने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यासोबत तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या संपर्कातील प्रत्येक मतदाराचे प्रबोधन तरुण मतदान करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. मतदानाबाबतची निरसता, नैराश्य दूर केले पाहिजे. मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असे न समजता आपली सर्व कामे सांभाळून मतदानाच्या दिवशी प्राधान्याने मतदान केले पाहिजे, असे नमूद करीत 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले स्वीप सदस्य राजेंद्र ढाकणे यांनी केले....
0 टिप्पण्या