🌟छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी दिन : मल्लविद्येची पंढरी निर्माणकर्ते.....!


🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले🌟

राजर्षी शाहू महाराजांची विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत त्यांच्याबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा खरा पुढारी मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला. अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला. मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. आपली राजकीय कारकीर्द समस्त समाजांना न्याय देण्यात खर्ची घातली होती, म्हणूनच त्यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहाने साजरी केली जाते.

      सामाजिक सुधारणांबरोबरच त्यांनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. शाहू मिलची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणारा उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले. त्यांनी सहकारी संस्थांचा कायदा करून सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.

     छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक होत. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण आदी सुधारणांचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म दि.२६ जून १८७४ रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते दि.१७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना दि.२ एप्रिल १८९४ रोजी राज्याधिकार प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर सन १८९१ साली त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई- आक्कासाहेब व आऊबाई या दोन कन्या झाल्या. त्यांनी प्रशासन- यंत्रणेनची पुनर्रचना करून बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. सन १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. 

      मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने त्यांनी दि.२६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५० टक्के शासकीय नोकऱ्या मागास वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे ते भारतातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या आदी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले. त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले. जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणारा कायदा जारी केला. 

     सन १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून त्यांनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सन १९१७मध्ये सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. ते शिक्षणसम्राट महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. मराठ्यांसाठी सन १९२०मध्ये स्वतंत्र क्षात्र जगद्‌गुरू पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले. त्यांनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अनेक गायक-गायिकांनी त्यांच्या आश्रयाने भारतभर कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. मल्लविद्येच्या प्रांतात त्यांनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही मल्लविद्येची पंढरी बनली. दस्तूरखुद्द महाराज हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते.  पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. छ.शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने सन १९१९ साली त्यांना राजर्षी पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. 

     अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने सन १९१८मध्ये ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे दि.६ मे १९२२ रोजी त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.

!! छ.शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त त्यांना व त्यांच्या लोककल्याणकारी कार्यांना मानाचा लवून मुजरा !!

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार. 

(भारताच्या वैभवशाली इतिहास-अस्मितेचे गाढे अभ्यासक.)

 मु.रामनगर वॉर्ड नं.२०,गडचिरोली.

 जि.गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप - ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या