🌟वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढावे या दृष्टीकोनातून वक्फ बोर्डाने मालमत्तांच्या नियमानुसार पुन्हा नव्याने करार होणार....!


🌟नव्याने करार करीत बाजार भावाप्रमाणे भाडे आकारले जाणार ; बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.बी.ताशीलदार यांची घोषणा🌟

परभणी (दि.१९ मे २०२३) : वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढावे या दृष्टीकोनातून वक्फ बोर्डाने मालमत्तांच्या नियमानुसार पुन्हा नव्याने करार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

            महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाची संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आहे. विशेषतः सर्वसाधारणपणे ०१ लाख एक्कर जमीन या वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. परंतु, वक्फ बोर्डास या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न हे अल्पशः असेच आहे. या पार्श्‍वभूमीवरच महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने उत्पन्न वाढविण्याकरीता वक्फच्या मालमत्तांचे नियमानुसार पुन्हा नव्याने करार करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे वक्फ बोर्डाने या नव्याने करारांसह वक्फ बोर्डाच्याही कामकाजात आमूलाग्र सुधारणा व्हावी, प्रशासनातही मोठी गतीमानता यावी, या दृष्टीकोनातून नव्याने कर्मचारी भरतीच्या हालचालीसुध्दा सुरु केल्या आहेत.

          वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.बी. ताशीलदार यांनी शुक्रवार १९ मे रोजी औरंगाबादेत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना प्रत्येक जिल्ह्यात वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरु करण्याचा मानस जाहीर केला. राज्यात नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती या ठिकाणी विभागीय कार्यालय तर औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्हास्थानी कार्यालय कार्यान्वित आहेत. मात्र, इतर एकोनवीस ठिकाणी वक्फ बोर्डाचे कार्यालय स्थापन केले जाणार आहे. त्या दृष्टीकोनातून वक्फबोर्डाने प्रत्यक्ष भेटी व कार्यालय स्थापनेसंदर्भात जागांची पाहणी व अन्य व्यवस्थापनात्मक कामे युध्द पातळीवर हाती घेतली आहेत.

          वक्फ बोर्डाद्वारे ऑनलाईन पोर्टलही सुरु केले जाणार आहे. त्याचे काम जवळपास पूर्ण होत आहे. याद्वारे नवी निविदा मागवून रेडीरेकनर च्या नियमानुसार मालमत्तांचे भाडे आकारले जाणार असून वक्फच्या अंतर्गत जवळपास साडेतीन हजारांवर संस्था नोंदणीकृत आहेत. परंतु, त्या संस्थांचे ऑडीट नाही, अशा या संस्थांना वक्फ बोर्डाने नोटीसा बजावल्या असून त्यामध्ये वक्फ बोर्डाचा हिस्सा सुध्दा या संस्थांना द्यावा लागणार आहे.

दरम्यान, वक्फ बोर्डाने सुरु केलेल्या या कारवाईने अतिक्रमण केलेल्या किंवा वर्षानूवर्षापासून अल्पशः भाड्यातच जागा बळकावून बसलेल्या व्यक्तींना नव्याने करार करीत बाजार भावाप्रमाणे भाडे आकारावे लागणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या