🌟ज्ञानेश्वरी समजून घेतली तर धर्मावरून भांडण होणार नाही - श्री.गुरु चैतन्यमहाराज देगलूकर


🌟पसायदानाच्या तिसऱ्या ओवीच्या निरुपणाने प्रवाचनाची सांगता🌟

सेलू (दि.08 एप्रिल) - आजच्या युगात आपण कुणाच्या मागे जावे ,कुणाचे आचरण करावे हे समजत नाही, आज बहुतांश लोक ज्यांच्या मागे जातात ते राजकीय आहेत.परंतु त्यासोबतच आज जर प्रत्येकाने ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला ,ज्ञानेश्वरी समजून घेतली तर धर्मावरून भांडण होणार नाही असे परखड मत श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूकर यांनी व्यक्त केले.


[सेलू : श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूकर यांचे पसायदान प्रवचनमालेत संतपूजन करतांना आयोजक महेश खारकर,ऍड.उमेश खारकर]

पसायदान या प्रवचनमालेच्या तिसऱ्या आणि समारोपाच्या प्रवचनात आज दि 08 एप्रिल रोजी साईबाबा मंदिरात पसायदान या विषयावर ते बोलत होते.सुरुवातीला संत पूजन करण्यात आले.यानंतर प्रवचनाला सुरुवात झाली.पुढे बोलतांना श्रीगुरु देगलूकर महाराज म्हणाले की,विकास हा एकदम न होता सुक्ष्मतेने होत असतो.काही व्यक्तिमत्व असे असतात त्यांचा प्रभाव आपल्यावर असतो.परंतु सध्या परिस्थितीत दुर्दैवाने लोक ज्यांच्या मागे जातात ते बहुतांश राजकीय असल्याची खंत बोलून दाखवली.ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात एका व्यक्ती बद्दल मागणी केली नाही तर सकळ मानव जातीसाठी केली आहे.महाभारत असा एक ग्रंथ आहे की वेगवेगळ्या व्यक्तींची व्यक्तिमत्व रेखाटलेली आहेत.त्यातील जवळपास सर्व भूमिका तसेच वृत्तीचे लोक आजही आपल्याला वावरतांना दिसतात." वर्षत सकळ मंडळी,ईश्वर निष्ठांची मांदियाळी,अनवर्त भु मंडळी"या ओवीचे निरुपण करतांना चैतन्यमहाराज देगलूकर म्हणाले की,तुकोबाराय,ज्ञानेश्वर माऊली यांनी जे अभंग दिले ते सकळ मानव जातीच्या कल्याणासाठी दिलेले आहेत.पसायदान जे दररोज म्हणतात त्यांची प्रत्येकाची जबाबदारी आहे की,ते पसायदान अमलात आणले पाहिजे." किंबहुना सर्व सुखी "या ओवी मध्ये सर्वांचं सुख मगितल्यानंतर देखील ज्ञानेश्वर माउलींनी " ग्रंथोप जीविये " या उक्ती नुसार  राहिलेल्या व्यक्तींसाठी देखील मागणी केली आहे.

विषय,ओढी,भुलले,जीव या चार शब्दात तुकोबारायांनी 3 व्याख्या रचल्या आहेत.जगाच्या पाठीवर असा रचयिता नाही.तुकाराम महाराजांनी हा विषय सर्वांसमोर मांडला आहे.विषय आणि विकार या दोन गोष्टी मानवाला त्रस्त करत असतात.अंधकार हा मानवाला सन्मार्गापासून भुलवतो यामुळे सन्मार्गाला यायचे असेल तर चिंतन करणे गरजेचे आहे.अज्ञानी लोकांना काम आणि क्रोधाशिवाय दुसरा पुरुषार्थ दिसत नाही.सांसारिक सुखाला मनुष्य अंतिम सुख मानतो हे दुर्दैव आहे,परंतु या पलीकडे खर मानवी जीवन सुरू होत.

जो स्वधर्माचे आचरण करतो तिथे पाप येत नाही.जिथं जिथं अधर्म आहे तिथं तिथं पाप आहेच.यामुळे या जगताने स्वधर्माचा सूर्य पहावा अशी मागणी ज्ञानेश्वर माउलींनी केली आहे.दुर्दैवाने धर्म ही चिंतन,अभ्यासाचा विषय होण्यापेक्षा तो वादासाठी वापरला जात आहे.आपला देश धर्म मानणारा देश आहे.धर्म ही सामान्य संकल्पना आहे आणि स्वधर्म ही विशेष संकल्पना आहे.

ज्ञानेश्वरी समजून घेतली तर धर्मावरुन भांडण होणार नाही.कर्म,धर्म आणि स्वधर्माची संकल्पना ज्ञानेश्वर माउलींनी विस्तारित रुपाने मांडली आहे.स्वधर्मचा सूर्य सगळ्यांनी पहावा,आपल्या वाटेला जे कर्म आलेलं आहे ते मनोभावे पूर्ण करावे अशी मागणीही ज्ञानेश्वर माउलींनी केली आहे.माणसाने धर्माचे आचरण हे अर्थ प्राप्ती साठी तर धर्म प्राप्ती साठी करायला पाहिजे असेही देगलूकर महाराजांनी सांगितले.स्वधर्माचे आचरण जर माणसाने केले तर त्याला जे जे पाहिजे ते प्राप्त होईल असेही त्यांनी सांगितले प्रवाचनाची सांगता पसायदाने झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले.

प्रवचन मालेच्या समारोपात भाविकांचा ऋणनिर्देश अंकिता महेश खारकर हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक महेश खारकर,ऍड.उमेश खारकर,प्रसाद खारकर,माजी प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी,प्रा.संजय पिंपळगावकर,विनोद मोगल,संजय धारासुरकर,किशोर खारकर,योगेश खारकर,श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे सर्व शिक्षक,कर्मचारी आणि वसंत प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या