💥परभणीत भरणाऱ्या ऊर्स काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत प्रशासनाला सहकार्य करा - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥या ऊर्स काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले💥


परभणी (दि.16 जानेवारी) : कोरोना साथीमुळे तीन वर्षाच्या खंडानंतर यंदा प्रथमच येथील सय्यद शाह तुराबुल हक  येथे 1 फेब्रुवारीपासून ऊर्स भरणार असून, या ऊर्स काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज येथे केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आर. रागसुधा, महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, उपजिल्हाधिकारी डॉ. सुशांत शिंदे, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, प्रादेशिक वक्फ बोर्ड अधिकारी खुसरो खान, जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी अब्दुल रफिक आणि  वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

ऊर्सकाळात येथे येणाऱ्या अनुयायांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, सोयीसुविधांबाबतची माहिती देणारे फलक जागोजागी दर्शनी भागात लावणे, दुकानांचे परवाने सहज मिळावेत, यासाठी येथे संबंधित विभागांची तात्पुरती सुविधा उपलब्ध करुन देणे, मदत केंद्राचे भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी क्रमांक दर्शनी भागात लावण्याबाबतचे आदेश त्यांनी दिले. या काळात परिसरात तयार होणारे खाद्यपदार्थ तपासण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांनी योग्य रितीने पार पाडावी. तसेच  शहरातील विविध भागातून येणा-या यात्रेकरू अनुयायांच्या प्रवासासाठी एसटी बसेस पुरविणे, अग्निशमन यंत्रणेच्या अधिका-यांकडून यात्रा काळात करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन त्यानुसार दुकानांची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी आयोजकांना दिले. तसेच व्यावसायिक दुकानांच्या जाहीर लिलावाचे व्हिडीओ रेकॉर्डींग करत ही  प्रक्रिया पारदर्शी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांसोबत आज परिसराची पाहणी करत आढावा घेतला. 

मागील अनुभव विचारात घेता वक्फ बोर्डाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यावसायिक आणि जिल्हा व पोलिस यंत्रणेसोबत योग्य समन्वयन ठेवून यात्रा काळात यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी  आयोजकांना केले आहे.ऊर्स यात्रा काळात महावितरणकडून विद्युत यंत्रणा चोख ठेवणे आणि यात्रास्थळाकडे येणाऱ्या रस्त्यातील खड्डे बुजवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राहणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आर. रागसुधा यांनी केल्या. तसेच यात्राकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्यावसायिक दुकानदारांची संपूर्ण माहिती वेळोवेळी देणे अनिवार्य राहील. तसेच या कालावधीत वक्फ बोर्डाने पोलीस यंत्रणेसोबत योग्य समन्वय ठेवण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांनी आयोजकांना दिले.

महानगर पालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्यामुळे  ऊर्स काळात महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणा-या सर्व सोयीसुविधांचे शुल्क वक्फ बोर्डाला भरावे लागणार आहे. यापूर्वीची थकबाकी आणि यावर्षीची मिळून 14 लाख रुपये महानगर पालिकेकडे जमा करण्याचे आवाहन मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांनी केले. यावेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना सोयीसुविधा पुरविण्याबाबत निवेदन दिले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या