💥परभणी जिल्ह्यातील वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.....!


💥अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे💥

परभणी (दि.14 डिसेंबर) :  नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 + 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2022-23 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींसाठी अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक/ शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने आपले अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

या योजनेसाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तसेच अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशन AH.MAHABMS (गुगल प्लेस्टोरवरील मोबाईल अॅपवर उपलब्ध) आहे. यासाठी अर्ज करण्याचा कालावधी  13 डिसेंबर 2022 ते 11 जानेवारी 2023 असून अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक : 1962 किंवा 1800-233-0418 संपर्क करण्याचे आवाहन केले आहे या योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत-कमी टाईप करावी लागेल. तसेच बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत-जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. तसेच मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/ शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केंव्हा लाभ मिळेल हे कळणार असल्याने लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे सहज शक्य होणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या