💥40 डोक्यांच्या रावणामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवलं गेलं : हा 'उलट्या काळजाचा कंपू.....!


💥उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका : पक्ष चिन्ह आणि नावाबाबत उद्धव ठाकरेंनी दिले तीन पर्याय💥

उलट्या काळजाचा कंपू फिरतोय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. आईच्या काळजात कट्यार घुसवली, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली श्रीरामचंद्राचं धनुष्यबाण यांनी गोठवलं. 40 डोक्यांचा रावण फिरतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना नावाशी तुमचा संबंध काय ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.शनिवारी निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी सायंकाळी फेसबुक लाईव्हद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

* तीन चिन्ह आणि तीन नावांचा पर्याय :-

या वे‍ळी उद्धव ठाकरे म्ह‍णाले, “आम्ही निवडणूक आयोगाकडे तीन चिन्ह आणि तीन नावांचा पर्याय दिला आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला यापैकी एक चिन्ह व नाव ताबडतोब द्यावे जेणे करुन आम्ही त्वरीत जनतेमध्ये जावू शकू. त्रिशुल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल या चिन्हांचा पर्याय आम्ही दिला आहे. तसेच नावासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पर्याय आम्ही निवडणूक आयोगाला पाठवले आहेत.”

* ४० डोक्यांच्या रावनाने प्रभू श्री रामाचं धनुष्यबाण गोठवलं :-

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे  नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गद्दारांनी पक्ष फोडला, भाजपशी युती करुन सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेला संपविण्याचे कारस्थान सुरु केले. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून हे सर्व कारवाया केल्या इथे पर्यंत ठीक होतं. पण, या गद्दारांनी आता या शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचे पाप केल्याची टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर नाव न घेता केली. यावेळी त्यांनी ४० डोक्यांच्या रावणाने प्रभू श्री रामाचं धनुष्यबाण गोठवलं अशी टीकाही त्यांनी केली.

* आईच्याच काळजात कट्यार घुसवली :-

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या शिवसेनेने तुम्हाला नाव दिलं तुम्हाला मोठं केलं, ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय ओळख दिली. अशा शिवसेनेचे नाव आणि चिन्ह तुम्ही गोठवलं. तुम्ही शिवसेना या आपल्या आईच्या काळजात कट्यार घुसवली, अशी टिका यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. तसेच शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनी दिले. या शिवसेनेला माझ्या वडिलांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवले. यावर तुम्ही हक्क कसे सांगू शकता असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

* माझा न्याय देवतेवर विश्वास : -

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, जो निवडणूक आयोगाने निकाल दिला तो निकाल अपेक्षित नव्हता. आम्ही कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली होती. कायद्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित नव्हता. पण, आपण सर्वोच्च न्यायालायत गेला आहोत. तेथे आपल्या नक्की न्याय मिळेल. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. शिवसेनेला न्याय मिळेल. आयोगाच्या निकालामुळे मी डगमगलो नाही. माझ्यात आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. मी शिवसैनिकांसोबत आहे आणि आम्ही येणाऱ्या आव्हानला सामोरे जावू असे उद्धव ठाकरे म्हणाले.

* उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक संवादातील मुद्दे :-

🔺🔺कोरोना काळात फेसबुकवरून संवाद साधायचो. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्री नको, मलाच हवं असं काहींचं म्हणणं होतं. मी वर्षा निवासस्थान सोडलं, मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला.*

🔺🔺मुख्यमंत्रिपद ज्यांना पाहिजे होतं ते त्यांनी मिळवलं. जे नाराज होते ते गेले. आपण सहन केलं. आता अति व्हायला लागलं आहे.शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्रिपदी नको, मीच व्हायला पाहिजे हा हट्ट ठीक आहे. आता त्यांना शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे हे अति होतंय. आवाका काय हेही पाहिलं पाहिजे.*

* खोकासुरांनी दसरा मेळावा होऊ नये यासाठी प्रयत्न केले. दसरा मेळावा अभूतपूर्व होता. तुम्ही मानता आहात म्हणून आम्ही आहोत. शिवतीर्थावरचा प्रतिसाद भारावून टाकणारा होता.*

* उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत आहे. 19 जून 1966 हा शिवसेनेचा स्थापना दिन. आजोबांनी (प्रबोधनकार ठाकरे) यांनी शिवसेना हे नाव दिलं. सामान्य माणसं शिवसेनेशी जोडली गेली.

* ठाण्याने पहिलं यश शिवसेनेला दिलं.वसंतराव मराठे नगराध्यक्ष झाले. अनेक जण श्रमले. मेहनत केली. त्यातून शिवसेनेचा विजयाचा रथ पुढे निघाला. आपत्ती आल्या, संकटं आली.

* शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावून पक्षासाठी लढले. काहींनी जीव गमावला, काहींनी तुरुंगावस भोगला. अनेकांनी दमदाट्या सहन केल्यात. मोडेन पण वाकणार नाही अशी भूमिका घेतली.

* मराठी माणसासाठी, भूमिपुत्रांसाठी लढणारी सेना म्हणजे शिवसेना.

* शिवसेना नावाशी आणि चिन्हाशी तुमचा संबंध काय? 'मिंधे गटा'चा भाजपने पुरेपूर वापर केला. गोंधळ घालायचा तो घालून झालेला आहे.

* काँग्रेसने शिवसेनेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला नाही पण ज्या शिवसेनेबरोबर तुम्ही लढलात ती संपवायला निघाला आहात.

* आत्मविश्वासाने ठासून भरलेले शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत. मी डगमगत नाही.

* बाळासाहेबांचं नाव न घेता लढून दाखवा. बाळासाहेब हवेत,मी त्यांचा मुलगा आहे. ठाकरे वगळून शिवसेना तुम्हाला गोशाळेत बांधायची आहे. शिवसेना वाघ आहे.

* चिन्हं गोठवलं आहे हा अन्याय आहे. 16 जणांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल प्रलंबित आहे.

* दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आज मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेली बैठक जवळपास दीड तास झाली.या बैठकीत शिवसेना नेत्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करताना त्यांची समजूत काढावी असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचं समजते.                     

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या