परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये संबंधित न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे 13 ऑगस्ट रोजी आयोजन....!


💥यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही ज्या न्यायालयात आपली प्रकरणे,केस आहे तेथे अर्ज करावा💥

परभणी (दि.16 जुलै) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्यामार्फत परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये संबंधित न्यायालय परिसरात शनिवार, दिनांक १३ ऑगस्ट,२०२२ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम १९८१ चेक बॉउन्स, बॅंक वसुली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, वीज (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरणे आणि दिवाणी स्वरुपांची इतर प्रकरणे तसेच बँकेची वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. तडजोडीअंती जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीकोनातून मा. न्यायाधीश व वकील यांचे पॅनल आपल्याला मदत करणार आहेत. यामध्ये महत्वपूर्ण बाब म्हणजे कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. ज्या न्यायालयात आपली प्रकरणे, केस आहे तेथे अर्ज करावा आणि सोबतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती येथे दि. १३ ऑगस्ट, २०२२ पूर्वी अर्ज करुन माहिती देणे गरजेचे आहे. 

  या राष्ट्रीय लोकअदालतीमुळे लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. प्रकरण, केसचा निपटारा त्याच दिवशी होत असल्याने आपला वेळ व पैसे याची बचत होते. दोन्ही पक्षकार मा.न्यायाधीश यांच्या समक्ष चर्चा करुन प्रकरण, केसचा निपटारा करु शकतात. त्यामुळे कटुताही निर्माण होत नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोक न्यायालयात न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणे जास्तीत जास्त ठेवून तडजोडीअंती निकाली काढण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शर्मा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या