💥उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला ही आमच्यासाठी दु:खाची गोष्ट ; शिंदे गटाची प्रतिक्रिया....!


💥रात्री उशिरा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली💥

 ✍️ मोहन चौकेकर

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला,भाजपाने ताज हॉटेलमध्ये आनंद साजरा केला,तरी गोव्यात पोहोचलेल्या शिंदे गटाकडून काहीच प्रतिक्रिया येत नव्हती. परंतू, रात्री उशिरा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागणे ही आमच्यासाठी दु:खाची गोष्ट आहे. आम्ही त्यांना लवकर निर्णय घेण्यासाठी सांगत होतो. परंतू, त्यांनी वेळ लावला, यासाठी काही मोठे नेते जबाबदार आहेत. आमच्यासमोरील पर्याय संपतील असे त्यांना आम्ही सांगितले होते, शेवटी ती वेळ आली, असे दीपक केसरकर म्हणाले.

आम्ही उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाण्याआधीच भेटलो होतो, सारे काही सांगितले होते. परंतू, आम्हाला काही नेत्यांनी लांब केले. ठाकरेंच्या एनसीपीचे नेते जवळचे झाले, आणि आम्ही लांब होत गेलो. त्याला उद्धव ठाकरे जबाबदार नाहीत. पण आता अंतर वाढले आहे, असेही केसरकर म्हणाले.

संजय राऊत मधेच असतील तर ठाकरे आणि शिंदे गट एकत्र  येण्याची शक्यता नाहीय. नाहीतर आम्ही ठाकरेंना आमच्यासोबत बोलवू, तेच आमचे नेते आहेत. आम्हाला जर कोणी डुक्कर, कुत्रा म्हणत असेल किंवा आमच्या आई, बहीणींना शिव्या देत असेल तर कसे आम्ही त्यांच्यासोबत राहू, असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला.

शिवसेनेतील १४ आमदार आणि आणि वेगळे नाही, आमचा गट एकच असेल. आता पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. कदाचित ते नसतील. आमचा व्हीप नाही पाळला तर त्यांना डिसक्वालिफाय करायचा की नाही हे शिंदे साहेब ठरवतील, असा इशाराही केसरकर यांनी दिला.

संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता उठून कसली कसली वक्तव्ये करायचे, ज्या मोदींना जगात नावाजले जाते त्यांना काहीबाही बोलायचे, कशासाठी असे वितुष्ट आणायचे. यामुळे आम्ही भाजपासून लांब गेलो. राऊत पन्नास टक्के राष्ट्रवादीचे आणि उरलेले शिवसेनेचे आहेत. ते नेहमी राष्ट्रवादीच्या बाजुने असतात. शिवसेना तुटली तरी त्यांना फरक पडत नाही, असा आरोप केसरकर यांनी केला......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या