💥आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


💥येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी बैठकीत श्री.पापळकर बोलत होते💥

हिंगोली (दि.०५ मे २०२२) : आगामी मान्सून ऋतूत आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करुन अधिक सतर्क, समन्वय व तत्परतेने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी बैठकीत श्री. पापळकर बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर,  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी श्री. पापळकर म्हणाले की, मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तींचा आपणांस सामना करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करावे आणि सतर्क राहावे.  यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. या आराखड्यात जिल्ह्यातील पूरप्रवण गावांचा सर्व नियोजनासह समावेश करावा.  पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहित नमुन्यात सादर करावी. तसेच तालुकानिहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करुन नेहमी सतर्क ठेवावे, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

तसेच पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील पूर प्रवण क्षेत्राबाबतचा नकाशा व माहिती तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास सादर करावी. तसेच धरणामध्ये पाण्याची आवक व जावक याबाबत माहिती दररोज कळविण्यात यावी, धरणातून पाणी सोडल्याने किती गावांमध्ये पूर परीस्थिती निर्माण होऊ शकते याबाबतही तात्काळ कळविल्यास इशारा व प्रतिसाद करीता योग्य तयारी करण्यास वेळ मिळेल असेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले. महावितरणने जिल्ह्यातील सर्व रोहित्रांची व लोंबकळणाऱ्या तारांची तपासणी करुन त्याची देखभाल दुरुस्ती करुन घ्यावी. तसेच यामुळे अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. पूर परिस्थितीत गावामध्ये पाणी शिरल्यास येथील विद्युत पुरवठा खंडीत करणे तसेच सुरळीत करणे याबाबत योग्य नियोजन करावे.             

आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करुन आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन अहवाल सादर करावा.  पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना वेळीच थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग पावडरची साठवणूक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा. जिल्हा परिषदेने आपल्या अंतर्गत येणाऱ्या  आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याचेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले. 

            नगरपालिका प्रशासनानेही नियंत्रण कक्ष कार्यान्वित करुन, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवून आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच शहरातील नालेसफाई तसेच अतिक्रमण दूर करावेत. शहरातील वस्तीमध्ये पाणी शिरणार नाही यासाठी योग्य ते नियोजन करुन शहरातील नाल्याची दुरुस्ती करावी जेणेकरुन शहरामध्ये पाणी तुंबणार नाही व पाण्याचा विसर्ग होण्यास मदत होईल, असे पहावे, तसेच  सार्वजनिक बांधकाम विभागाने व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करावी, रस्त्यावरील धोकादायक व वाळलेली झाडे या पासून अपघात होणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे.तसेच  रेल्वे प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पाटबंधारे विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य राखीव पोलीस दल क्र. 12, गृहरक्षक दल, पंचायत समिती या बरोबरच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित असणाऱ्या सर्व विभागांनाही आपापल्या यंत्रणांची पूर्वतयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या. 

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, महावितरणचे रविन्द्र व्यवहारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, सर्व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह  विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या