💥वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीत ८०२ प्रकरणे तडजोडीने निकाली...!


💥औपचारिक उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती शैलजा सावंत यांनी लोकअदालतीच्या पॅनेलला भेट देऊन केले💥

फुलचंद भगत

वाशिम:-जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन १२ मार्च रोजी करण्यात आले.औपचारिक उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती शैलजा सावंत यांनी लोकअदालतीच्या पॅनेलला भेट देऊन केले.


        जिल्ह्यात १२ मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीसाठी एकूण १० हजार ७९४ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८०२ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडील २९७ प्रकरणासह एकूण ५४३० प्रकरणे तसेच दाखलपूर्व ५३६४ प्रकरणे अशी एकूण १० हजार ७९४ प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात आली होती. लोकअदालतीत ६४७ आणि दाखलपूर्व प्रकरणातील १५५ अशी एकूण ८०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली.एकूण २ कोटी ९९ लाख ३० हजार ६२० रुपये एवढ्या रकमेचे प्रकरणे निकाली काढण्यात आली. या अदालतीत महत्त्वाचे म्हणजे न्या.श्रीमती एस.व्ही. फुलबांधे यांच्या पॅनेलवरील किरण विरुद्ध ज्ञानेश्वर या पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाचे प्रकरण आपसी तडजोडीने मिटले

             जिल्ह्यातील न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये मोटार अपघात प्राधिकरणाकडे प्रलंबित असलेले शोभाताई विरुद्ध आयसीआयसीआय हे प्रलंबित प्रकरण तडजोडीसाठी न्या. एस.एम.मेनजोगे यांच्या पॅनलवर होते. या प्रकरणात दोन्ही बाजूचे विधिज्ञ आणि पक्षकार तसेच पॅनल प्रमुख आणि पॅनल सदस्य यांनी प्रयत्न करून या प्रकरणात २० लाख रुपये नुकसान भरपाई देऊन हे प्रकरण मिटविले.या प्रकरणाचा निपटारा झाल्यामुळे या प्रकरणातील अर्जदार यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.   

          प्रथमच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग या ठिकाणीदेखील राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.या पॅनलला देखील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत यांनी भेट दिली.यावेळी त्यांच्या समवेत न्या.एच.एम.देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.संजय शिंदे उपस्थित होते. येथे पॅनल प्रमुख म्हणून पी.पी. देशपांडे, जिल्हा ग्राहक निवारण आयोगाचे अध्यक्ष श्री.जोशी व इतर पॅनल सदस्य उपस्थित होते. या ठिकाणीदेखील पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला. 

                    ७ ते ११ मार्च या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात विशेष कलमांतर्गत प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये सर्व न्यायिक अधिकारी यांनी विशेष मेहनत घेऊन ८९९ प्रलंबित प्रकरणे निकाली काढली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या