💥राज्यात लवकरच पोलिसांच्या 7231 पदांची भरती : होमगार्डांना वर्षात कमीत कमी 120 ते 150 दिवस काम देण्याचा निर्णय...!


💥राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली घोषणा💥

✍️ मोहन चौकेकर

राज्यात 5297 पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या पोलिसांना नेमणुका दिल्या जातील. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत पोलिसांच्या 7231 पदांची भरती केली जाईल, अशी खूशखबर पोलीस भरतीसाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिली 


विरोधकांच्या कायदा सुव्यवस्थेवरील प्रश्नावर उत्तर देताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची भरती येत्या काळात सुरू करण्यात येईल. पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या पदाची भरती करताना कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत. ही भरती पारदर्शक पद्धतीने केली जाईल.

पोलीस दल सक्षम करण्यासाठी प्रयत्न :-

पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. याअंतर्गत पोलीस ठाण्यांच्या तसेच पोलीस क्वार्टर्सच्या ज्या ब्रिटिशकालीन तसेच जुन्या इमारती आहेत त्यांची दुरुस्ती तसेच नवीन इमारती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्य राखीव पोलीस दलात असलेल्यांना पोलीस दलात सामावून घेण्यासाठी 15 वर्षं सेवेची असलेली अट आता 12 वर्षे करण्यात आली आहे.

होमगार्डनाही वर्षातून कमीत कमी 120 ते 150 दिवस काम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे पोलीस दलात शिपाई पदावर भरती होणाऱया पोलिसांना कालबद्ध पदोन्नती देऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.....

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या