💥प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी शाळा बचाव समिती आक्रमक.....!


💥विद्यार्थी-पालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहु नका : लेखी निवेदनाव्दारे दिला प्रशासनाला इशारा💥

फुलचंद भगत

वाशिम :जिल्ह्यातील वर्ग एक ते सात पर्यंतच्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच इतर सर्व खाजगी प्राथमिक शाळा विनाविलंब सुरू कराव्यात. या मागणीसाठी जिल्हा परिषद शाळा बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांना ( दि. 14 सप्टेंबर ) रोजी तक्रार देऊन  शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. 

                दिलेल्या निवेदनानुसार, कोरोना या आजारामुळे गेल्या दिड वर्षांपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व इतर सर्वच खाजगी शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे  जे शैक्षणिक नुकसान झाले ते कधीही भरून निघणार नाही. 

   सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने माध्यमिक वर्ग सुरू केले आहेत.  मात्र ईयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक वर्ग सुरू केले नाहीत. परिणामी , विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.     जिल्ह्यातील विविध गावात व शहरात असलेल्या जिल्हा परिषद शाळा 775 आहेत. तसेच इतर खाजगी शाळांचीही संख्या मोठी आहे. या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

  सद्यस्थितीत कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याने तसेच गावखेड्यांमध्ये संपूर्ण जनजीवन सुरळीत सुरू असल्याने सर्वच पालकांना शाळा सुरू होऊन आपल्या मुलांना शिक्षण मिळावे असे वाटत आहे. शाळा सुरू करण्यासाठी कुठल्याही पालकाचा विरोध असण्याचे कारण नाही.गावखेड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना ऑनलाइन शिक्षण फार दूरची बाब आहे. त्यामुळे खेड्यातील विद्यार्थी पूर्णपणे शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जात आहे. 

  याबाबत  जिल्हा परिषद शाळा बचाव समितीच्या वतीने बऱ्याच गावातील पालकांशी चर्चा केल्या आहेत.  या माध्यमातुन शाळा सरसकट सुरू व्हाव्यात अशीच सर्व पालकांची मागणी आहे.त्यामुळे पालकांच्या  मागणीच्या अनुषंगाने  वर्ग 01 ते 07 च्या प्राथमिक जिल्हा परिषद शाळा तसेच ईतर सर्व  खाजगी शाळा विनाविलंब सुरू कराव्यात अशी मागणी पालकांनी केली असल्याचे शाळा बचाव समितीने निवेदनात म्हटले आहे. शासनाने पालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अन्यथा, जिल्ह्यातील सर्व पालकवर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सदर तक्रारीची तात्काळ तात्काळ दखल न घेतल्यास  शासनाच्या विरोधात टप्प्याटप्प्याने  तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच त्यानंतर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आता याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागले आहे. या निवेदनाची प्रत शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे.निवेदन देतांना जिल्हा परिषद शाळा बचाव समितीचे संयोजक गजानन धामणे, सामाजिक कार्यकर्ते तथा पालक गणेश नाना शिंदे, कवी साहित्यिक महेंद्र ताजने, अनिल शिंदे, प्रा. मंगेश भुताडे, संतोष आसोले, शेख ईसाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

💥कोरोनाच्या आडून बहुजनांवर ज्ञानबंदी लादण्याचे सत्ताधाऱ्यांचे षडयंत्र :-

 शतकापुर्वी मनुस्मृतीनुसार बहुजनांना ज्ञानबंदी होती. आता भारतीय राज्यघटनेनुसार सर्वांना शिक्षण घेण्याची समान संधी असली तरी प्रतिगामी शक्ती विविध   क्लृप्त्या लढवुन बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचत आहे. कोरोना काळात सर्व निर्बंध शिथिल झाले असतांना कोरोनाच्या आड केवळ शाळा बंद ठेवून बहुजनांना ज्ञानवंचीत ठेवण्याचा सत्ताधारी वर्गाचा डाव आहे . अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद शाळा बचाव समितीचे संयोजक तथा सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या