💥हदगाव तालुक्यातील उंचाडा गावातील भयावह घटना,रेती तस्करांचे राक्षसी कृत्य💥
नांदेड/जिल्ह्यात अवैध रेती तस्करीत गुन्हेगारी प्रवृत्तींनी शिरकाव केल्याने या व्यवसायात आता अनेक टोळ्या कार्यरत झाल्याचे निदर्शनास येत असुन महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी तसेच नदीकाठावर शेत जमिनी असलेल्या शेतकऱ्यांच्या जिवितास या अवैध रेती तस्कर टोळ्यांपासून प्रचंड धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे.अशीच भयावह दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचाडा या गावात घडली असून अवैध रेती तस्करांनी अवैध रेती तस्करी व अवैध रेती तस्करीस अडसर ठरत असलेल्या शेतकऱ्याची भर दिवसा हत्या केल्याचे उघडकीस आली आहे.या भयंकर घटनेमुळे नदीकाठ परिसरात शेतजमीन असणाऱ्या नांदेडच्या शेतकऱ्यांत प्रचंड दहशत पसरली आहे.अवैध रेती माफियांना पोलिसांसह महसूलच्या अधिकाऱ्याचे पाठबळ मिळत असल्याने त्यांच्या हिंमतीत प्रचंड वाढ झाली असून रेती तस्करांची मजल आता थेट हत्या करण्यापर्यंत गेली आहे.
अवैध रेती माफियांनी हत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव शिवाजी कदम (35) असं आहे. शिवाजी यांचे कयाधू नदीकाठी शेत आहे. याच नदीतून आरोपी त्र्यंबक चव्हाण आणि त्याचे साथीदार अवैधरित्या रेती उपसा करत असतात. आज दुपारी मयत शिवाजी कदम यांनी शेतातील ऊसाला पाणी दिले. त्यामुळे रस्त्यावर चिखल झाला. चिखल झाल्याने वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर नदीत जाऊ शकले नाही. याच कारणातून आरोपी त्र्यंबक चव्हाण याने शिवाजी कदम यांच्यासोबत वाद घातला आणि धारदार शस्त्राने वार केले. यात शिवाजी कदम यांचा जागीच मृत्यू झाला.
शिवाजी यांची हत्या त्यांचे वडील कोंडीबा कदम यांच्या डोळ्यादेखत झाली. मुलाला वाचविण्यासाठी त्यांनी टाहो फोडला. मात्र बचावासाठी कुणीही पुढे आले नाही. त्यातून आरोपींनी शिवाजी कदमच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यात शिवाजी जागीच गतप्राण झाले. मृत शिवाजी हे शेतकरी संघटनेचे धाडसी कार्यकर्ता होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलनात सातत्याने सहभाग घेतला होता. आज त्यांची निर्घृण हत्या झाल्याने उंचाडा गावात तणावाची स्थिती आहे.
दरम्यान, कयाधू नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असताना पोलीस किंवा महसूल विभागाने कुठलीच कारवाई केलेली नाही. वेळेत वाळू माफियांवर कारवाई झाली असती तर कदाचित शेतकऱ्याचा बळी गेला नसता. या घटनेने उंचाडा गावात तणावाचे वातावरण आहे.
मनाठा पोलिसांनी रेतीमाफियांना पाठीशी घातल्यानेच ही हत्या झाल्याचा आरोप होत आहे. सध्या रेतीला सोन्याचा भाव आल्याने नांदेड जिल्ह्यात सर्वत्रच रेतीची तस्करी सुरु आहे. त्यातून आता या रेतीमाफियांची हत्या करण्याइतपत मजल गेली आहे. रेतीच्या तस्करीमुळे जिल्ह्यातील कयाधू, पैनगंगा, आसना, मांजरा, गोदावरी आदी नद्यांच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण आहे. त्यातच पोलीस आणि महसूल प्रशासन या रेतीमाफियांना छुपा पाठिंबा देत असल्याने आज थेट हत्येची घटना घडली आहे.
0 टिप्पण्या